Monday, March 14, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ५

चार कोसांवर भाषा बदलते असं म्हणतात.
पदार्थांचंही तसंच आहे.

माणूस शेती करायला लागला, स्थिरावला.
खाण्यायोग्य किती किती फळं, पानं, मुळं, खोडं त्याने शोधून काढली.
शिवाय वेगवेगळे प्राणी खाऊन बघितले असणार.
भाजणे, शिजवणे, वाफावणे, वाळवणे अशा प्रक्रिया शोधून काढल्या असतील.
कशाबरोबर काय, कशापद्धतीने, हे ही शोधलं असेल.
मग आपल्या ज्ञानाचा ठेवा पुढच्या पिढीकडे सूपूर्द केला असेल.
.
.
आणि मग ते आपल्यापर्यंत आलेलं आहे.
मी जो स्वैपाक करते ते मुख्यत: आईचं पाहून, शिकून शिवाय आत्यांचं आणि आणखी कुणाकुणाचं पाहून शिकले.
आई, तिच्या आईचं, मोठीआईचं पाहून, आईला सासू नसल्याने बाबांनी जे आणलं असेल ते पाहून शिकली.
मोठीआई तिच्या आईचं पाहून ती विदर्भातली होती शिवाय तिच्या मामेसासूचं पाहून, ती केरळातली होती.
स्वत: मोठीआई तेलंगणात राहिली, तिच्या सूना तिथल्याच.
त्यामुळे मी जी खाद्यसंस्कृती घेऊन पुण्याला आले ती अशी तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, केरळातली अशी असणार.
मी जे करते त्यात गुंतपांगाळू/भोंगराळू, मेथीचा घोळाणा, काकडीची थालीपीठं, चिंचेचं सार, आंबट वरण.... असे पदार्थ आहेत.
 आंबट वरणाचं एक मजेशीर गाणं आमच्याकडे आहे.
आंबट वरणा
तुझीया चरणा
करोनी नमस्कार
सख्या भेट दे लवकर!
:)
कुणीतरी दूरदेशी जाऊन केलेलं गाणं असेल. :)
आम्हांला आंबट वरण अतिशय प्रिय आहे.
त्यामुळे जगात कुठेही गेले तरी मी आंबट वरण बरोबर नेणार हे नक्की होतं.
अर्थात मला जगात कुठेही जायचं नव्हतं, भारतात म्हणू या.
भारतातही नाही, महाराष्ट्रात, मराठी बोलणार्‍या माणसांत,
आणि महाराष्ट्रात मला औरंगाबादलाच राहायचं होतं.
औरंगाबादला नसणारच राहायला मिळत तर मग पुण्याइतकं छान  शहर नाही. :)

ठरल्याप्रमाणे आंबट वरण - भात तर मी घेऊन आले.
मीच स्वैपाक करायचे म्हणून पहिल्यांदा मी आंबटवरणाची स्वैपाकघरात प्रतिष्ठापना केली.
मिलिन्द आधी भात खायचा नाही, माझं भाताशिवाय व्हायचं नाही.
सवयीने तो थोडा भात खायला लागला.
हॉस्टेलवर राहिलेला असल्याने त्याला वेगळं खाण्याची सवय होती.
माझ्या पद्धतीच्या भाज्या त्याला आवडल्या नसतील/नाहीत, त्याने चालवून घेतलं.
माझं म्हणणं होतं की त्याच्या पद्धतीचा स्वैपाक हवा असेल तर त्याने तो करावा.
तुझ्या पद्धतीच्या भाज्या कर, आयतं मिळणार असेल तर मला चालेल.

जेव्हा लग्न होतं तेव्हा दोन खाद्यसंस्कृती एकमेकांना भिडत असतात.
मुलींनी सासरचं वळण अर्थात ती खाद्यसंस्कृती स्विकारावी असंच त्यांना शिकवलं जातं.
सासरच्या पद्धतीच्या, नवर्‍याला आवडणार्‍या भाज्या शिकाव्यात/कराव्यात हे अपेक्षित असतं.
ते नाही का? सुप्रसिद्ध वचन! ’ नवर्‍याला जिंकायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो.’
कशी क्रियापदे वापरली जातात ते पाहा. जिंकणे वगैरे, लग्न हे एक युद्ध आहे याची भाषेला पुरती जाणीव आहे. :)

नवर्‍याला जिंकायचं म्हणजे जिंकून त्याच्यावर राज्य करायचं असं नाही,
त्याची सेवा करायची, त्याने आपली सेवा कबूल करावी हे पाहायचं.
( त्याने दुसर्‍या स्त्रीकडे बघू नये, असंही अपेक्षित आहे की काय?!)

लेकी माहेरघरी येतात तेव्हा आया त्यांच्या आवडीचं करून घालतात/घालत असत.
( आता परिस्थिती थोडी बदलली आहे.)
कारण हा पदार्थ या पद्धतीने सासरी मिळत नाही, तो तर करतच नाहीत म्हणून.

माझ्य़ा माहेरच्या आणि सासरच्या खाद्यसंस्कृतीत बराच फरक आहे, दोन्हीकडे शाकाहार असला तरीही.
आमच्याकडे भाज्या-वरणात, पोहे-उपम्यात कशातही साखर घालत नाहीत.
भाज्यांमधे साखर घातली की त्या चविष्ट होतात की साखर न घालता अधिक चांगल्या लागतात?
हे कसं ठरवणार? आपल्या सवयींवर असतं.

भाजीवरण-उपमापोहे यात कशातही मी साखर घालत नाही.
( सासूबाई किंवा नणंदा आल्या तर त्या घालतात, पण त्या आलेल्या असतानाही मी माझ्या पद्धतीने करते, त्यांनी समजा केले तर त्या घालतात.)
मिलिन्दला गोड पदार्थ जरा गोSड लागतात. हा बदल मी केला आहे, मलाही आता त्याची सवय झालीय.
पोळ्या आमच्याकडे जरा जाड असतात. पूर्वी मी मिलिन्दच्या पातळ आणि माझ्यासाठी जाड लाटायचे. :)

साध्या साध्या गोष्टी असतात.
म्हणजे भात. भातात काय फरक? असं वाटू शकतं.
आमच्याकडे मोकळा करतात तर मिलिन्दकडे आस्सट! म्हणजे मऊ.
लग्न झाल्यावर सुरूवातीला एकदा मी संगमनेरला कुकर लावला आणि मोकळा भात केला.
मिलिन्दच्या आत्या आलेल्या होत्या, त्या म्हणाल्या, "भाताची शितं मोजता येतील. पाणी मोजून टाकलं नाहीस का?"
:)
मला तर वाटत होतं की किती छान मोकळा भात झालाय! माझ्यामुळे सगळ्यांना त्यादिवशी मोकळा भात खावा लागला.
आमच्याकडे आई काय सांगायची, असं पाणी बेताने टाकायचं, गिच्च गोळा भात करायचा नाही, मोकळा झाला पाहिजे.
:)
सुनांनी काय करायचं? तर सासरची रीत शिकून घ्यायची.
माझ्या पाहण्या-ऎकण्यात एकही असा जावाई नाहीये, जो सासरी गेल्यावर सामान्य परिस्थितीत, सहज अगदी सहज कुकर लावतो आहे किंवा पोळ्या लाटतो आहे. कुणाला माहित असेल तर कळवा.

मला काय कळलं? कुठल्याही प्रकाराला हा जास्त चांगला असं म्हणता यायचं नाही, सवयीवर आहे.
माझ्या सासरच्या माणसांना माझ्या माहेरच्या पद्धतीचं जेवण आवडणार नाहीये. माहेरच्यांना सासरचं आवडत नाही.
आमच्याकडे लग्नाच्या जेवणात तर जाड जाड आणि खूप मोठ्या पोळ्या लाटतात मग त्याचे उलथन्याने तुकडे करून वाढतात.
सासरच्यांना नसेल आवडलेलं.
याच्या उलट माझे मामा इकडच्या लग्नाला आलेले, गोडसर भाजी-वरण ते वैतागले ते म्हणाले मला जरा मिरचीचा ठेचा आणा.
ठेचा आणला तर काय? त्यातही साखर!
:)

आमच्या घरात या आघाडीवर आम्ही/ मी काय केलं? बरेचसे तह केले. रोजचे भाजी-वरण माझ्या पद्धतीने, गोड अधिक गोड मिलिन्दच्या पद्धतीने, पंजाबी ,गुजराती, दाक्षिणात्य पदार्थ शिकले तसे तसे, बाकीचे बाहेर जाऊन.
या युद्धात काही पदार्थ शहीद झाले.
त्यात एक कढी! आमच्यापद्धतीची जरा आंबट कढी मला खूप आवडते. मिलिन्दकडची साखर घातलेली गोडसर त्याला खूप आवडते.
माझी कढी बाजूला काढून मग त्यात साखर घातली तरी त्याला आवडत नाही.
त्याच्या पद्धतीने करून साखर घालण्याआधी बाजूला काढली तर ती मला आवडत नाही.
कढी आम्ही आमच्या आमच्या माहेरी जाऊन खातो.

(लग्नाआधी किंवा एकमेकांबरोबर राहण्याआधी एकमेकांना हे सांगावं की तुझ्या आवडीचे चार पदार्थ तू शिकून घे.)


( क्रमश:) 

अक्कणमाती चिक्कणमाती -- ६

******

1 comment:

  1. वाचते आहे.
    दरवेळी पुढच्या भागाची उत्सुकता वाढते आहे.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...