Thursday, March 10, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ३

घराघराचा अन्नाकडे, जेवणाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन असतो.
आमच्याकडे औरंगाबादला असं आहे की ताजं आणि गरम जेवावं.
चवीपेक्षा वेगवेगळे प्रकार खायचेच, असं आहे.
रूचकर नसेल पण ते आरोग्यदायी असेल तर ते खायला हवं.
जेवण ही शरीरक्रियांसाठी, उर्जेसाठी आवश्यक बाब आहे.
तेवढंच महत्त्व त्याला आहे, जीभेवर ताबा महत्त्वाचा आहे.
आपण काहीही ( व्हेज) खाऊ शकतो, हे आम्हांला भारी वाटायचं.
बाबा कधीतरी कडुनिंबाच्या पानांचा कुटून रस काढत आणि ग्लासभर रस सहज पीत.
आमच्यासाठी अर्धा ग्लास असे. तो चेहरे वेडेवाकडे न करता प्यायला आम्ही शिकलो.
न आवडणार्‍या चवीची भाजी असेल तर ती संपवणं आम्हांला आव्हानात्मक वाटायचं.
आम्ही ती संपवायचो.
ताटात काहीही टाकायचं नाही.
हवं तितकंच वाढून घ्यायचं.
काहीही वाया घालायचं नाही.
आई आमच्याकडे पत्ताकोबीच्या दोन भाज्या करत असे,
पानांची एक आणि मग खालच्या खोडाच्या भागाची एक.
कोथिंबीरीच्या काड्यांची चटणी किंवा त्यांची मोळी बांधून आई वरणात सोडत असे,
नंतर ती काढून टाकायची मस्त स्वाद उतरतो, थोडीशीच पानं टाकली तरी चालतात.
यामागचं एक कारण काटकसर हे ही होतं.

माझ्या सासरचं थोडं वेगळं आहे.
तिथे चवीला महत्त्व आहे.
जे काय घरात असेल त्यात, याच्याऎवजी ते, वापरून आई पदार्थ करते.
आत्यांचं तसं नाही. त्या ठरल्याप्रमाणे करतात.
त्या पदार्थांवर जास्त मेहनत घेतात.
तेल, तूप सढळ हस्ते वापरत, पदार्थ नटवतात.
त्यांचे पदार्थ रूचकर असतात.
त्यांनी पदार्थाचा एक दर्जा ठरवलेला असतो,
तसा त्यांना व्हायला हवा असतो.
नाही झाला तर त्यांचा मूड जातो.
चवीला महत्त्व असल्याने, पदार्थ अधिकाधिक चविष्ट करत जाणे, हे घडतं.
ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे.
बाकी त्यांच्यासाठी अंदाज, वाया न जाणं हे फारसं महत्त्वाचं नाही.
शिळं अशी काही संकल्पना नाही.

अन्नासंबंधीचं आपलं जे वागणं असतं ते आपल्या डोक्यात असतं,
आपल्या विचारात असतं.
आपण काय विचार करतो आणि का करतो? हे प्रत्येकाने पाहायला हवं असतं.
जगभरात असा कुठलाही पदार्थ नाही की जो रूचकर आहे असं जगातली प्रत्येक व्यक्ती सांगेल.
आपल्या सवयी असतात, आपल्या भावना असतात, आपल्या आठवणी त्याच्याशी निगडीत असतात.
आपल्या घराच्या म्हणून परंपरा असतात, इतिहास असतो.
संगमनेरला नरकचतुर्दशीच्यादिवशी सकाळी फोडणीचे पोहे करतातच,
सगळे फराळाचे पदार्थ असतात तरीही. कारण मिलिन्दची आजी तसं करायची म्हणून आत्या करतात.
छान वाटतं.

माझा अन्नासंबंधीचा विचार काय आहे?
मुख्यत: तो औरंगाबादच्या घरासारखा आहे.
पण विशिष्ट पदार्थासाठी विशिष्ट साहित्य, ठराविक प्रमाणात घ्यायचंच,
आणि तो पदार्थ आपल्याला हवा आहे तसा करायचा.
चवीकडेही लक्ष पुरवायचं हे मी वाढवलेलं आहे.

स्वयंपाकघर सांभाळणारी/ चालवणारी म्हणून माझी काय जबाबदारी आहे, असं मी मानते?
घरातल्या सगळ्यांना आणि आल्या गेल्यांना वेळच्यावेळी पोटभर जेवायला घालणं ही माझी जबाबदारी आहे.
त्यासाठीचा कच्चामाल आहे ना? हे पाहणं. पथ्यपाणी असेल तर ते सांभाळणं.
स्वयंपाकात वैविध्य आणणं. प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडीचा विचार करणं.
आपण " समतोल आहार " करतो आहोत ना? हे पाहणं.
त्यासाठी तेलातूपाचा , गोडाचा अतिरिक्त वापर न करणं.
मुलांच्या मनात अन्नाविषयीचा एक दृष्टिकोन तयार करणं.
स्वयंपाक करायचा म्हणजे काय काय करावं लागतं, हे मुलांपर्यंत पोचवणं. :)

( क्रमश:)

**********

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...