Thursday, July 31, 2014

हे ही कधीतरी बोललं पाहिजे

दोन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख

********

मी खूप हिंमत करून हे लिहित आहे.
मी शेवटपर्य़ंत लिहू शकीन असं वाटतंय.
सत्यमेव जयते चा दुसरा बाललैंगिक शोषणावरचा भाग पाहिला.
आणि लिहायचेच असे ठरवले आहे.
*******

मी पाच- सहा वर्षांची होते. वाड्यात सगळे मुलगे आणि मी एकटी मुलगी. सगळ्या घरांमधून फिरायचे, सगळ्यांची लाडकी. खूप बोलत असे. वाड्यातले नुकते लग्न झालेले, उमेदवार असलेले काका/ काकू मला खास गप्पा मारायला बोलवत.
आणि
.........................
त्यातलेच एक काका होते, तेव्हा काकू बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि दार लावून घेतलं. फारतर पाच मिनिटे मी त्यांच्या खोलीत असेन. जे काय त्यांनी केलं ते किळसवाणं होतं.
.................
नंतर
त्यांनी मला बांगड्यांच्या आकारातलं लोखंडी स्प्रिंग दिलं, ते फोर्बस कंपनीत होते, तिथल्या टाकाऊ मालातलं ते असायचं, वाड्यातल्या आम्हां मुलांना ते खेळणं फार आवडायचं, पूर्वीही त्यांनी मला दिलेलं होतं, मी त्यांना आणखी मिळालं तर आणा असं सांगीतलेलं.
.........
मी घरी आले, ते खेळणं कोपर्‍यात टाकून दिलं. घरात कोणाशीही काही बोलले नाही.
........
सहा वर्षांच्या एका छोट्या मुलीसाठी ही असली घाणेरडी गोष्ट ....... कुणाला न सांगता...... स्वत:च्या मनात पुरून ठेवणं...... खूप अवघड होतं...... ती एक बोलकी मुलगी होती..... काही खुट्ट वाजलं तरी वाडाभर जाऊन सांगायची......
तिने ते केलं..... कुणालाही काही सांगीतलं नाही..... तिला कळलंच नसणार, कसं सांगावं ते....
.......
आणखी चार दिवसांनी ....... त्यांनी अचानक मला उचलून त्यांच्या खोलीत नेलं...... मी ओरडले नाही.... पुन्हा तसेच.... पाच मिनिटांनी मला बाहेर सोडले आणि चाराणे माझ्या हातात ठेवले..... चॉकलेट घे म्हणून.......
................................
मी ते पैसे घट्ट मुठीत धरून घरी घेऊन आले................. माझ्या लाडक्या खिडकीत बसले................... आणि ते पैसे खिडकीतून मागच्या बोळीत टाकून दिले.
.........................
जे काय घडतंय त्याचं काय करायचं मला काहीच कळत नव्हतं.
....
आणखी दोन दिवसांनी असेल... मी खाली अंगणात खेळत होते, ते वरच्या मजल्यावर राहायचे ...... गॅलरीच्या कठड्याला टेकून त्यांनी मला ’ये ’ अशी हाताने खूण केली. मी जे पळत घरात जाऊन बसले. कोणीही कितीही बोलावलं तरी बाहेरच आले नाही. नाही मला खेळायचं आणि नाही मला बाहेर यायचं असंच सांगत राहिले........
.......
नळाजवळ आम्ही लावलेल्या गुलाबाशेजारी उभी असलेली ती सहा वर्षांची मुलगी.... छोटीशी.... फ्रॉक घातलेली..... आणि वर कठड्याला टेकून तिला ये म्हणणारा तिच्या गोष्टीतला राक्षस......
ते दोघे अजून माझ्या डोळ्यासमोर आहेत....
त्यानंतर जीव खाऊन ती मुलगी घरात पळाली... ते ही
.........................

पुन्हा असं काही झालं नाही. त्यांच्याबद्दल लोक, आईबाबा चांगलंच बोलायचे, "किती बिचारा सज्जन माणूस" असेच. ते कधी घरी आले तर मी पळून बाहेर जायची. काकू आल्यावरही मी शक्यतो त्यांच्या घरात जायचीच नाही. त्यांचं बाळ पाहायला आईबरोबर गेले तर आईचा पदर धरूनच बसले.
पुढे वर्षसहा महिन्यात ते वाडा सोडून दुसरीकडे राहायला गेले.

पुढे साताठ वर्षांनी ते अकाली गेले. सगळेच त्याबद्दल हळहळत होते.
मला इतकं बरं वाटलं.

.....................

पुढे कधीही असं काही घडलं नाही.
माझं बालपण याने काळवंडून गेलं नाही.
मी ते माझ्या मनात पुरून ठेवलं...... जणू दुसर्‍याच कुणा मुलीचा अनुभव असावा तसं.
सुरूवातीला याचा खूप त्रास झाला असेल. ते कळावं असं माझं वय नव्हतं.
मोठी होता होता, कधी कधी हे आठवलं की मला त्रास व्हायचा.
मोठी झाल्यावर यात माझा काहीच दोष नव्हता, मी मला कोसत बसले नाही.
तरीही ही खूप त्रासदायक आठवण होती.

....................

मी हे अजूनही आईबाबांशी बोलू शकलेले नाही.
मी त्यांना सांगीतलेलंच नाही.

.......................

लग्नानंतर मिलिन्दशी बोलावं, असं बरेचदा वाटून गेलेलं.......
मी शब्दच गोळा करू शकायचे नाही....

...........
आम्ही मॉन्सून वेडींग हा सिनेमा पाहायला गेलेलो. शेवटी शेवटी मी रडायला सुरूवात केली. मी वेड्यासारखी रडत होते. सिनेमा संपला. मी रडत होते.... आम्ही रस्त्यावरून चालत होतो..... मी रडत होते. मिलिन्दला कळेनाच मला काय झालंय ते...... मला वाटतं आम्ही हॉटेलात गेलो.... तिथेही मी रडत होते....... मला रडू आवरताच येत नव्हतं.
किती वर्षांनी त्या घटनेसाठी मी रडून घेतलं.
...................
घरी आल्यावर मी मिलिन्दला सांगीतलं....
इतक्या वर्षांनी..... पहिल्यांदा.... मी कुणाशीतरी बोलले.....
खूप मोकळं मोकळं वाटलं.....

..........
परवा शनिवारी.... सकाळी कोरीगडावर जाऊन आले..... संध्याकाळी/ रात्री आशाकडे छान जेवलो, मस्त गप्पा मारल्या. अख्खा दिवस छान गेलेला. रविवारी सकाळी घरी आले. पुन्हा थोड्यावेळाने झोपले....

अकराला मिलिन्दने उठवलं. ’तुला सत्यमेव जयते पाहायचंय ना?" उठले.... अख्खा एपिसोडभर रडतच होते.

मिलिन्द म्हणाला ," किती हिमतीनं सांगीतलं ना त्यांनी! "

वाटलं आता बोललंच पाहिजे......
तुम्हांला तरी सांगीतलं पाहिजे.
 
...................

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...