Monday, September 30, 2013

द लंच बॉक्स

मला हा चित्रपट खूप आवडला.

ही एका मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी आहे.
शाळेत जाणारी एक मुलगी, ऑफीसला जाणारा एक नवरा, वर राहणार्‍या देशपांडे काकू, आजारी वडील, आई आणि परीक्षेतील अपयशाने आत्महत्या केलेला भाऊ.
 नवर्‍याला आपलंसं करण्यासाठी वेगळं काहीतरी बनवण्याच्या खटपटीत ती.... इला.
तिला नवर्‍याची जवळीक खरोखर हवी आहे का? माहीत नाही.
पण नवर्‍याची मर्जी पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात ..... ती.
जी कुणीही असू शकते.
नवरादेखील ऑफीस आणि काम यात पिचलेला.
नवर्‍याचं कुठे काही अफेअर तर नसेल? ती साशंक! असेल किंवा नसेलही.
पण तिच्या डोक्याला खुराक!

मुंबई
तोच पाऊस, तीच गर्दी, तेच डबे, तीच ने आण, तेच तेच ..... घडत काहीच नाहीये.
दुबारा बारीश शुरू हो सकती है!

गेली बारा की पंधरा वर्षे देशपांडे काकू, आधी कोमात गेलेल्या आणि आता दिवसा छताला टांगलेल्या फिरत्या ओरीयंट फॅन कडे बघत असणार्‍या नवर्‍याची देखभाल करताहेत.

खाली वर राहणार्‍या शेजारणींचं चांगलं सख्य आहे.

खाली वर सुरू असलेल्या संसारातही साम्य आहे का काही?
इलाचा नवराही दिवसा चाकोरीच्या फॅनमधे अडकलेला तर नाही?

काहीच न घडणारे कदाचित खुपसे दिवस!

आणि एक दिवस कधी न घडणारी चूक डबेवाल्यांकडून होते.
इलाने नवर्‍यासाठी तयार केलेला डबा कुणा साजन फर्नांडीस नावाच्या विक्षिप्त समजल्या जाणार्‍या अकौंटंटच्या टेबलावर जातो.
त्याची बायको वारलेली मागेच.
तोही स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला जाण्याचं ठरवत असलेला.
अनपेक्षित चवदार जेवणाने तो सुखावतो.

डब्यातून चिठ्ठ्यांची देवाण घेवाण सुरू होते.

अजूनही तेच ते, वेगवेगळ्या भाज्या तयार करणं, डबा भरणं, डबेवाल्याने नेणं, पोचवणं, परत आणणं.
पण आता मनं बदलली आहेत.
तेच तेच असलं तरी त्यात प्रेम मिसळलंय, उत्कंठा आहे, वाट पाहणं आहे.
साध्या साध्या गोष्टी सांगायला त्यांना कुणीतरी मिळालंय.

रोजचं चाकोरीतलं जगणं आपण टाळू शकत नाही, आजू बाजूची परीस्थिती बदलू शकत नाही.
प्रेम, आस्था, आपुलकी, शेअरींग याने जगणं बदलून जातं.

कधीही जाऊ शकणार नाही असा एक भूतान मनात तयार होतो.

तोही बदलतो. केवळ शेखमुळे नाही तर नव्या मैत्रिणीमुळे, कधीतरी शेखच्या घरी जाऊन येतो, त्याच्या चुका दुरूस्त करत बसतो. गल्लीतल्या मुलांशी दोस्ती होते.

चित्रपटभर दोघांची भेट अशी होत नाही.

ती एकदाच इराण्याच्या हॉटेलमधे त्याची वाट पाहात थांबते,
एकट्या बाईसाठी असं वाट पाहात थांबणं किती साहसाचं आहे!
(तिचा नवरा कुठेही गेला तरी देशपांडे काकू विचारणार नाहीत पण दुपारभर ही नव्हती तर त्यांच्या चौकशा सुरू.)

चित्रपटाच्या शेवटी तो तिच्याकडे यायला निघतो.
कदाचित भेटेल कदाचित नाही.
दोघे मिळून भूतानला जातील?
कोण जाणे, नाहीच बहुदा.

सगळ्यांनी कामं छान केलेली आहेत. इरफान खान, नवाजुद्दिन सिद्दिकी आणि निम्रत कौर.
संथ, छोट्या छोट्या प्रतिक्रिया टिपणारा सिनेमा आहे.
भारती आचरेकरने नुसत्या आवाजाने देशपांडे काकूंचं व्यक्तिमत्व उभं केलं आहे.

पाहायलाच हवा असा चित्रपट आहे. चुकवू नका.

दिवाळीअंकातल्या एखाद्या जमून आलेल्या गोष्टीसारखा आहे.

Thursday, September 26, 2013

स्त्री हीच स्त्रीची शत्रू?? किती खरं.. किती खोटं..

"स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू असते" असं वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळत... कधीकधी ते खंर आहे असं वाटायलादेखील लागतं. सासू-सून, जावा-जावा, नणंद-भावजय यांच्यात अगदी निखळ मैत्रीचे/ सुखद नाते अगदी अभावानेच आढळून येते.

का बंर असेल असं?? स्त्रिया ह्या काय जन्मजात हेवेदावे आणि मत्सराच्या मुर्त्या असतात का??

आणि खूप विचार केल्यावर कळले.. याची मुळे सुद्धा आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतच दडलेली आहेत.

१) सासू-सून:

सासूने जनरली मागच्या पिढीतली असल्याने आत्ताच्या पिढीपेक्षा जास्त सहन केलेले असते. पुरुषप्रधान सत्ता घरात कडक शिस्तीची असेल तर तिने आयुष्यभर दुय्यम स्थान अनुभवलेले असते. ना तिच्या विचारांची किंमत केली जात ना ती दिवसभर करत असलेल्या कामांची.. त्यामुळे वैतागलेल्या आणि काही अंशी पिचलेल्या अश्या बाईच्या मुलाचे जेव्हा लग्न होते तेव्हा समाज तिच्या हातात सून नावाचे एक सोफ्ट टार्गेट देतो. आयुष्यभर कुणाचे ना कुणाचे बॉसिंग सहन केलेल्या या बाईच्या हातात तिचे ऐकेल (रादर जिला तिचे ऐकावेच लागेल), असं एक(मेव) माणूस मिळत (हो.. एकमेवच.. बाईची सासू झाली म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेले पुरुष तिच्या मताला ह्या वयातही मान देतातच असं नाही.. त्यांना मुळी सवयच नसते ना तशी).  थोडक्यात सांगायचे तर पुरुष प्रधान संस्कृती मध्ये, आपल्याला हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्त्री सोडून अजून तरी घरातल्या स्त्रीला इतर कोणावर वचक ठेवता येत नाही आणि मग ती सुनेवर सत्ता चालवायला लागते.. तिला आपल्या मनाप्रमाणे वागवू पाहते.. तिच्याकडून तिच्या सासूने जबरदस्तीने करून घेतलेली सेवा/ मानपान हे ती विसरली नसते (ते विसरणे शक्यच नसते.. पूर्वीच्या काळी मुलींची लहान वयात लग्न होत असत..आणि अश्या वयात त्यांच्या सासूकडून त्यांचा झालेला छळ हा त्यांच्या कोवळ्या मनावर मोठाच आघात होता.. त्यामुळे तो आयुष्यभर लक्षात राहिलेला असतो). तीही तसेच करून घ्यायचा प्रयत्न करते. नव्या पिढीच्या सुनेला हे विचार पटत नाहीत. आणि (आताच्या पिढीच्या) तिच्या शिक्षणामुळे आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे तिला जे पटत नाही ते ती मुळीच करत नाही. मग अर्थातच भांडण/ वादावादी होते आणि मग दोघी एकमेकींच्या शत्रू बनतात.

२) जावा-जावा:

यांच्यातील वादाची कारणे घरातले पुरुष कोणाला (जरातरी) मान देतात किंवा घरच्या मोठ्या निर्णयात (बायकांसाठी मोठा निर्णय म्हणजे लग्नात कुणाला काय आणि किती आहेर करायचा इत्यादी) कुणाचे मत विचारात घेतात ह्या स्थानासाठी झगडा हे होय. हे झाले एकत्र कुटुंब पद्धतीत.. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीतसुद्धा सासू-सासरे कॉमन असतात. त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे वागणाऱ्या एकीला एक आणि स्वत:च्या मताला महत्व देणारया.. (थोडक्यात जराश्या आधुनिक) अश्या सुनेला वेगळी वागणूक दिली कि उगीचच एकीच्या मनात दुसरीविषयी क्लीमिष तयार होते. काही वेळेला नवरेच उगाचच "वहिनी बघ कशी घरासाठी राबत असते.. तिची सर तुला येणारेका?" अशी काडी सारून देतात.. आणि मग भडका उडतो.

३) नणंद-भावजय:

ह्या केस मध्ये आपल्यावर प्रेम करणारा भाऊ/ बाबा आता घरात नवीन आलेल्या मुलीला हे प्रेम/ तो मान (हा मान म्हणजे फार काही नसतो.. फार तर ती पडद्यांचे किंवा घराला मारायचे रंग ठरवते) मिळतो आहे हे घरातून आता गेलेल्या मुलीला पटत नाही. माहेरचे आपले स्थान अबाधित ठेवायसाठी ती उगाचच माहेरच्या गोष्टीत ढवळा-ढवळ करत राहते. आणि सुनेला याचा राग येतो. त्यातच "दुरून डोंगर साजरे" या न्यायाने घरातल्या मुलीला आपली सासू आपला खूप छळ करते आणि आपली आई मात्र आपल्या वहिनीचे खूप लाड करते आहे असा काहीतरी समज होतो. काही वेळेला हे प्रकरण "वहिनी माझ्या आईचं नीट करत नाही.. तिला हवा-नको तो मान देत नाही" इथपर्यंत विचारांची मजल जाते.. आणि मग मत्सर आणि शत्रुत्व..

अर्थात हे चित्र आता बदलते आहे. आपल्या सासूने आपला छळ केला म्हणून आपणही आपल्या सुनेचा छळ करायचा हि प्रवृत्ती सगळीकडेच असेल असं नाही. काहीवेळा अगदी क्वचित का होईना पण आपण जे सोसले ते आपल्या सुनेला भोगायला लागू नये अशीही इच्छा दिसते. पण क्वचितच.. कारण पुरुषसत्ताक सिस्टीम हि स्त्रीला 'कधी ना कधी आपणही एक दिवस सासू होऊ आणि ह्या संसाराच्या रगाड्यातून सुटका होईल' ह्या आशेच्या गाजरावरच जगवत असते.. ती तरी सहजपणे आपलं सासूपण कशी बर विसरेन??

तरीदेखील पूर्वीच्या परंपरांप्रमाणे हा काही विशिष्ठ नात्यांमधली तेढ आणि दुस्वास पण अजूनही खालच्या पिढीत कुठेतरी झिरपतो आहे याची अजूनही अध्येमध्ये जाणीव होते.
आपण कितीही मैत्रीचे नाते निर्माण करायचे म्हटले तरी काही नात्यांच्या बाबतीत समाज आपल्याला तसं करू देत नाही.. मला आठवतंय.. लग्नानंतर सुरुवातीला माझी सासू मला फार काम करू द्यायची नाही. घरच्या लाडक्या मुलीसारखी मी घरभर बागडत असायची नुसती.. तेव्हा अनेकांनी येऊन "सुनेला फार डोक्यावर बसवून घेऊ नका ह..नंतर डोक्यावर मिरया वाटायची" असे सल्ले अगदी माझ्यासमोर दिलेले आहेत". म्हणजेच स्त्रियांनी शत्रुत्वाच्या चक्रातून एखाद्या नात्याची सुटका करू पाहिली.. तरी समाजाला ते बघवत नाही.. अमुक नात्यातल्या माणसांनी एकमेकांशी अमुक पद्धतीने वागले पाहिजे हे सुद्धा समाजच ठरवू पाहतो.. हा असला कसला समाजाचा जाच/ कसली जबरदस्ती??

कधीकधी विचार केला तर वाटते.. "फोडा आणि राज्य करा" ह्या तत्वाला अनुसरूनच पुरुषप्रधान समाज मुद्दाम स्त्रियांमध्ये वादाची बीजे पेरतो. कारण घरातल्या स्त्रिया एक झाल्या , तर त्यांच्यावर सत्ता गाजवणे घरच्याच काय.. कोणत्याच पुरुषाला शक्य नाही याची त्यांना स्पष्ट कल्पना आहे. स्त्रियांमध्ये असुरक्षितता बिंबवण्यामागे ह्या समाजाचा मोठाच हात आहे.

म्हणूनच आपल्या आईत, वहिनीत, बहिणीत आणि बायकोत, चांगले संबंध निर्माण व्हावेत, चांगले संबंध असतील तर ते टिकावेत, त्यांच्या संवादात आणि नात्यात शक्य तितका मोकळेपणा यावा यासाठी प्रयत्न करणारा पुरुष मला नेहमी आदरास पात्र वाटत आला आहे. अश्या पुरुषांना स्वत:च्या सत्तेपेक्षा घरातला आनंद आणि शांती जास्त महत्वाची वाटते असे माझे मत आहे.

Sunday, September 15, 2013

बाईपणाची ... ओझी...



बाई असणं विसरता येत नाही.
म्हणजे बाई असणं मला नाकारायचं नाही, ते मला नकोसं आहे असं नाही.
माझ्या पुरूषाबरोबर माझ्या बाई असण्याचं काय करायचं ते मी बघून घेईन.
इतर पुरूषांच्या किंवा बायकांच्या किंवा मिश्रगटात मला सहज मोकळेपणाने , माणूस म्हणून वागायचे तर ते शक्य होत नाही.
माझी अपेक्षा अशी आहे की निदान काही वेळा ते विसरता यावं आणि आणि इतर वेळी नाही विसरता आलं तरी त्याचं ओझं होऊ नये.

हे बाई असणं विसरता येत नाही, त्याचं ओझं होतं याचे कितीक प्रसंग मला सांगता येतील.
खूप बायकांसाठी ही ओझी नसतीलही, बायकांनी कसं वागायचं हे मुरवलेलंच असतं ना आपल्यात.

नीटनेटकं बसायचं. आवरून बसायचं. घरातल्या मानाच्या जागा पुरूषांसाठी सोडून बसायचं, माझी आई जेवायला बसताना कायम अर्धी मांडी घालून बसते. म्हणजे एका पायाची आडवी घडी आणि एका पायाची उभी. बायकांनी कमी जागा व्यापायची. लहानपणी मी सगळ्यांच्या नकला करायचे तेव्हा मला कळलं. मी तिच्या मागेच लागले, तू छान मांडी घालूनच जेवायला बसायचंस तर गंमत म्हणजे तिला जमेना. नीट जेवता येईना. अवघडल्यासारखं झालं.
 बायकांनी आपले आतले कपडे दिसत नाहीयेत ना याची काळजी घेत राहायचं. ते वाळत घालायचे ते सुद्धा कुठेतरी लपवून.
पूर्वी नीट डोक्यावरून पदर, मग नीट खांद्यावरून, मग ओढणी व्यवस्थित घ्यायची, हुश्श! आता ते संपलंय, निदान शहरांमधून, शहरातल्या आम्ही वावरतो त्या स्तरामधून.
 पाळी सुरू असेल तर कपड्यांवर किंचितही डाग पडू नये याची काळजी घेत राहायचं. मला कधी कधी वाटतं की क्वचित कधी पडला डाग तर पडू दे की. काही वाटून घ्यायचं नाही. घामाने ओले झालेले कपडे दिसतात. चिखलाने माखले तर थोडा वेळ, घरी परतेपर्यंत चालवूनच घेतो ना. डाग पडण्याचा इतका ताण असतो, मग गडद रंगाचे कपडे घालायचे, ओढणीचे ड्रेस घालायचे.
 आणि माफक हसायचं, गडगडाटी हसू वगैरे बायकांसाठी नाही. पूर्वीतर तोंडावर हात ठेवून हसायचं, हातामागे दडून. मनमोकळं हवं तेवढं हसायचं नाही. नाजूक चालायचं. मान खाली घालून वगैरे
एकूण आत्मविश्वासाचं आणि आत्मसन्मानाचं खच्चीकरण.
 आधी पुरूषांनी जेवायचं मग बायकांनी जेवायचं.
पूर्वीतर पुरूषांनी बाहेरच्या खोलीत थांबायचं, बायकांनी स्वैपाकघरात जायचं.
कुठेही गेलेला असलात तरी वेळेत परतायचं.
काही काम नसताना गावभर हिंडायचं नाही.
बायकांनी चालण्या, बोलण्या, राहण्या, वागण्याचे इतके नियम आहेत ना, त्या म्हणजे कायम डोंबारणीसारख्या दोरीवरून कसरत करत चालत असतात.
 आपण सराईतपणे वातावरणाच्या दाबाचं ओझं घेऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर वावरावं, तसं पिढ्यान पिढ्यांच्या संकेतांचं ओझं घेऊन बायका जगत असतात. त्यांना त्याचा पत्ताच नसतो.

बायकांना जी नेमून दिलेली कामं आहेत ती अतिशय कंटाळवाणी आहेत. घर सांभाळणं. हे अतिशय किचकट, वेळखाऊ, तेच तेच असं काम आहे.
 त्यामुळे होतंय काय की घर व्यवस्थित ठेवणं ही बायकांची जबाबदारी आहे. त्याचं ओझं होतं.
घर सजवणं, त्याची मांडणी हे सर्जनशील काम आहे पण धूळ पुसत बसणं, चादरीच्या सुरकुत्या काढत बसणं कंटाळवाणं आहे,
बायकांना त्याचा ताण येतो.

 आणि स्वैपाकघर सांभाळणं, मला त्याची अजिबात आवड नाही.

घरचं, परंपरेनं आलेलं देवाधर्माचं करत राहणं. तेही एक ओझंच असतं.

बायका जेव्हा जमतात, विशेषत: समारंभांमधे तेव्हा दिसणं, कपडे, दागिने यावर बोलत बसतात, तिथे वेळ काढणं अवघड होतं. कदाचित याला ओझं म्हणता येणार नाही.

 हल्ली ना , दात सरळ, रांगेत असले पाहिजेत चं एक ओझं मुलींवर, कदाचित मुलांवरही आहे.

 बायकांवर आणखी एक ओझं म्हणजे त्यांचं वजन नियंत्रणात ठेवणं.
सध्या उच्चमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय स्त्रियांना त्यांच्या वजनाचं फारच पडलेलं आहे.
आरोग्याचं कारण आहेच, पण त्यापलिकडेही दिसण्याचं कारण आहेच.
मला जाड असायचं नाही. मिलिन्द म्हणतो, तू पण हे ओझं बाळगतेस.
असेलही.

 आणखी एक ओझं म्हणजे
यशस्वी नवर्‍याची बायको म्हणून पार्ट्यांना जायचं.
अगदी ओझं नाही पण अवघडलेपण आहेच.

हो, आदर्श बायको असण्याचं ओझं, आपला नवरा कसा परीपूर्ण आहे हे दाखवण्याचं ओझं, नवराबायकोचं कित्ती छान चाललेलं आहे, हे दाखवण्याचं ओझं,
 नवराबायको मधली वादळं कुणाशीतरी बोलावीत, तर असं अक्षरश: कुणीच नसतं कितीक बायकांना (पुरूषांनांही) , जेव्हा भांडणं आप्तांना कळायला लागतात तेव्हा वेळ निघून गेली आहे अशीच शक्यता असते.

 सार्वजनिक ठिकाणी बायकांसाठी बाथरूम्सची सोय नसते, पुरेशी नाही. त्यामुळे बाहेर पडल्यावर नैसर्गिक धर्मासाठी कुठे जावंच लागू नये याची मुली लहानपणापासून सवय करतात. कार्यालयांमधेही पुरेशी सोय आणि स्वच्छता असतेच असं नाही. त्यामुळे पुरेसं पाणी न पिणार्‍या बायका आहेत. युरीन इन्फेक्शन, आणि संबंधित विकारांचं मूळ बरेचदा या व्यवस्थेत आढळतं.
 आम्ही इंजिनीअरींगला असताना तास सगळे मेन बिल्डींगमधे पण एकुलती एक लेडीज रूम मागच्या इमारतीत असल्याने आम्हांला तिकडे जावे लागायचे. त्यातही व्यवस्था अशी होती की लेडीज रूमबाहेर जिन्याजवळ टॉयलेटस मग १२-१५ मुली आणि ४०० मुलं असं प्रमाण असणार्‍या आमच्या कॉलेजात जाणार्‍या येणार्‍या सगळ्यांना कळणार की आम्ही तिकडे जातोय. कोणी नाही पाहून आम्ही जायचो आणि यायचो.  कोणीही असो, आपल्याला जायचंय तर जावू हे करण्यासाठी आम्हांला वेळ लागलेला, धैर्य गोळा करावं लागलेलं. त्यानंतर मग आम्ही मुलींनी आम्हांला मेन बिल्डींगमधे एक लेडीज रूम किंवा किमान एक टॉयलेट हवं आहे ची मागणी केली होती.
 तर बाथरूमला जाऊन येण्याचा एक कार्यक्रम आणि तो कसा पार पाडायचा याचं बायकांना ओझं असतं.

आपण एकातरी मुलाला जन्म दिला पाहिजे, याचं ओझं बायकांवर असतं.

प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं एक ओझं असतं. विवहितांपेक्षा कुठल्याही पुरूषाशी वागताना त्यांना फारच काळजी घ्यावी लागते.

 कधी माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना? या खोलवरच्या भीतीचं एक ओझं घेऊन बायकांना जगायला लागतं.





******

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...