Sunday, March 31, 2013

मुलीचं घर -- २


यापूर्वीचं

http://asvvad.blogspot.in/2012/10/blog-post_31.html

पुढे

>> याची मुळं शोधत गेलो तर "मुलीने लग्नानंतर मुलाच्या(!) घरी जायचं" या आणि एकूणच पुरुषप्रधान समाजाने ठसवलेल्या सर्व नियमांत असेल ना.
हो.

>> जावयाचे घर जसं मुलीचं व्हायला लागलं तसं मुलाचं घर सुनेचं व्हायला लागलं..
आता काहींच्या बाबतीत सुनेपेक्षा मुलीच्या घरात जास्त मोकळेपणा जाणवतो असं होत असेल.
हो.

>> आजकालच्या घरांमध्ये,खूपदा मुलीच्या आई वडिलांचा,सहभाग जास्त असतो.ते परके पण वगेरे वगेरे फक्त बोलण्या पुरेसे असते.
असेल काही घरांमधे.

>> माझ्या घरापासून पायी ५ मिनिटावर राहणार्या माझ्या चुलत बहिणीकडे आई बाबा नेहमी येतात.. पण मुंबईहून पुण्यात येऊनही इकडे सक्ख्या मुलीकडे थांबत नाहीत..
असंही आहे.

 कुठल्याही समाजात म्हणजे समाज रचनेत काही ठळक जबाबदार्‍या आणि कर्तव्ये यांच्या नीट रेषा आखलेल्या असल्या तर बरं पडत असणार.
 आपली पुरूषप्रधान व्यवस्था असल्याने आई वडीलांची जबाबदारी मुलावर, वडीलांची इस्टेट परंपरेने मुलाकडे/ मुलांकडे येणार.
 मरताना पाणी द्यायला मुलगा हवा, मेल्यानंतर अग्नी द्यायला मुलगा हवा.
 या व्यवस्थेत मुलगा असणं / होणं हे आवश्यकच होतं. नाहीतर दत्तक घ्यायचे, पण मुलगा हवाच.

 मुलगा असण्याच्या अट्ठहासापायी मुलींचे गर्भ पाडणं, सर्रास सुरू झालं. कारण आता दोन-तीनापेक्षा अधिक मुलं परवडण्यासारखी नाहीत हे पटलेलं, आणि मुलं हवं की नको, यासाठी संततिनियमनाची साधनं सहज उपलब्ध झालेली.
 पण विज्ञान पुढे गेलं म्हणून लगेच मानसीकता थोडीच बदलते?
 समाजात दाखवायला तरी मुलाचंच घर हक्काचं!
सहज मुलीकडॆ राहणारे किंवा मुली सहज माहेरीच राहताहेत आणि जावाई सासरी राहतोय अशी उदाहरणे विरळच आहेत.
 ज्यांना एक किंवा दोन मुलीच आहेत त्यांनी काय करायचं? असे आईवडील, अगदी परावलंबी होईपर्यंत मुलीकडे सहसा येत नाहीत.

 पूर्वीच्या एकत्र कुटूंबपद्धतीत नसला मुलगा तर पुतणे पाहायचे , वडीलोपार्जित घर असायचं, घराला माणसं लागायचीच. त्या घरातही स्वत:चा मुलगा नसेल तर आश्रितासरखं राहावं लागत असेलही. पण घर आणि माणसं तर असायचीच.
 मी कुठल्याही कुटूंबपद्धतीचा इथे पुरस्कार करत नाही आहे.
आताच्या विभक्त कुटूंबपद्धतीत, जेव्हा मुलीला इस्टेटीतही हक्क मिळतो आहे आणि बर्‍यापैकी समानतेनी वाढवलं जातं आहे, तर आईवडीलांनी मुलीकडे राहण्याचा संकोच वाटून घेऊ नये.
 लगतच्या भविष्यात ते दिसायला लागेल असं मला वाटतं.
मुलींनीही आपली आईवडीलांबाबतची कर्तव्ये सासरघरी स्पष्ट केलेली असली पाहिजेत.
 एकदा मुलगीसुद्धा म्हातारपणीची काठी आहे, आधार आहे, हे मनात बिंबलं, समाजात दिसायला लागलं की ”मुलगाच हवा’ चा हट्ट कमी होईल.

*********

 माझी एक वहीनी आहे, अगदी पुरूषप्रधान समाजाची कडीच, तिची आई गावी एकटी राहायची, मुलाचं सुनेचं आईशी पटायचं नाही, मुलगा तर आईचं तोंड पाहायलाही तयार नाही, आई आजारी पडली, एकटी राहणं शक्य नव्हतं, ही माझी वहीनी आईला आपल्या घरी घेऊन आली. आणि नंतर शेवटपर्यंत ठेवून घेतलं. भावानीच हे करायला पाहिजे, नाही तो करत, तर काय करायचं? म्हातारीलाही वाटे काय हे मुलीकडे राहण्याचे दिवस आले.
 पण वहीनी्ने आईला वार्‍यावर सोडलं नाही. मला तिच्याबद्दल आदर वाटतो.

*********
 पुढे

5 comments:

  1. काही वर्षांपूर्वी चतुरंगमध्ये वाचलेली आठवण..

    १९५०~६० च्या काळातली.
    पुण्याहून लोक मुलगी पाहायला अमरावतीला गेले. ३ मुलींपैकी मोठी मुलगी, भाऊ नाही.
    दोन्हीकडून पसंती झाली, याच बैठकीत ठरवून टाकू इथपर्यंत चर्चा आली..
    मुलाचे वडील म्हणाले, की आम्हाला मुलाशी जरा बोलायचंय. मुलगा-आई-वडील वरती माडीवर गेले. मुलीकडचे लोक काळजीत पडले.
    खाली आल्यावर हे चेहरे पाहून मुलाच्या वडिलांनी खुलासा केला, याला जे सांगितले ते तुम्हालाही सांगतो.
    "ही या घरातली मोठी मुलगी आहे, वार्धक्यात आई-वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी तिची आहे आणि तिचा नवरा म्ह्णून तुझीही. देव करो आणि तशी वेळ न येवो पण आलीच तर ही जबाबदारी तुला समर्थपणे पार पाडता यायलाच हवी. आणि ही जाणीव तुला आज असायला हवी".

    लग्न झालं.

    कुठल्याही विषम पातळीवरच्या नातेसंबंधामध्ये, वरच्या पातळीवर विराजमान असलेली माणसं जर समंजस शहाणी असतील तर समानता रुजण्यास मदत होते याचं उदाहरण म्हणून मला हा किस्सा लक्षात राहिला.

    ReplyDelete
    Replies
    1. >> कुठल्याही विषम पातळीवरच्या नातेसंबंधामध्ये, वरच्या पातळीवर विराजमान असलेली माणसं जर समंजस शहाणी असतील तर समानता रुजण्यास मदत होते याचं उदाहरण म्हणून मला हा किस्सा लक्षात राहिला.
      खरं आहे.

      नाहीतर मुलीला भाऊ हवाच, अशी अट होती, अशी कितीक कुटूंबे मला माहीत आहेत.

      Delete
    2. मुलाला बहीण नको अशी अट असणारी कुटुंबे आणि मुलीही.

      Delete
    3. माझी एक दूरची नणंद आहे, दोघी बहिणी व आई. वडील गेले आणि भाऊ नाही. धाकट्या बहिणीच लग्नं झालं. मोठीचं न होण्याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येक स्थळी तिने ’आईची जबाबदारी माझ्यावर असेल’ अशी स्पष्ट कल्पना दिली. सुशिक्षीत नातेवाईक देखील तिच्या या विचारांना आगाऊपणा मानतात... समंजसपणा इतका दुर्मिळ असतो !!

      Delete
  2. >> एकदा मुलगीसुद्धा म्हातारपणीची काठी आहे, आधार आहे, हे मनात बिंबलं, समाजात दिसायला लागलं की ”मुलगाच हवा’ चा हट्ट कमी होईल.
    (हे नोंदवलेलं) आवडलं.

    >> पण वहीनी्ने आईला वार्‍यावर सोडलं नाही. मला तिच्याबद्दल आदर वाटतो.
    नेमका कशाबद्दल आदर वाटतो?

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...