Friday, August 31, 2012

छोट्या छोट्या गोष्टी - ४


एका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या नातेवाइंकांमधे मिसळून जाऊ शकेन अशा वेशात होते. साडी का नेसली नाहीस?, मंगळसूत्र कुठं आहे? हे सुरूवातीचे प्रश्न टाळून, पुढे गप्पा मारता येणार होत्या.
चुलत बहीण, आतेबहीण जवळपास वर्षानंतर भेटत होत्या. त्यांच्या मुली लग्नाला आल्या आहेत.
एकीकडे पूजा चालली होती. आम्हांला काही फारसे काम नव्हते. आमच्या गप्पा सुरू झाल्या.
आतेबहीणीच्या मुलीला ’नीट पाहून/ बोलून नवरा निवड. असं सांगत होते."

आपल्याकडे मुलीला वाढवतात/ वाढवायचे ते तिचे लग्न करून देण्यासाठी असेच असते.
लहानपणापासूनच त्यादृष्टीने सवयी लावल्या जातात.
आणि लग्नाचे वय झाल्यावर त्यावरून एक सफाईचा हात फिरवला जातो.

बोलताना विषय ’आजकालचे कपड” इकडे वळला.
बहीण मुलीची तक्रार करत म्हणाली, " या मुलींना जीन्सची सवय असते. नीराला (तिच्या मुलीला) झोपतानाही पॅंट-टीशर्ट घालायची सवय आहे. आवरून सावरून बसणं माहीतच नाही!"
मी म्हणाले, " बरं आहे की, त्या पोषाखात बिनधास्त वावरता येतं. साडीसारखं नाही, इकडनं वर गेली का? तिकडनं गेली का? पाठ दिसतेय का? अन पोट दिसतय का? सांभाळावं लागत नाही."
" अगं पण सांभाळायची सवय असली पाहिजे. मी नीरासाठी दोन गाऊन घेऊन आले आहे. सांगीतलंय हे घालूनच झोपायचं. झॊपेतही कपडे सावरायची सवय हवी. " पुढे म्हणाली, " मी झोपते तेव्हा, झोपेत जर माझा परकर घोट्याच्या वर गेला तरी मला कळतं. मी तो व्यवस्थित करते. "
मी अवाक झाले. मला कळेचना काय बोलावं ते!

मला वाटलं माझ्या या बहीणीला मी किती कमी ओळखते! ही बाई वयात आल्यापासून कधीही गाढ, बिनधास्त झोपलेली नाही!
(तिने दर वेळी परकर/गाऊन घोट्याच्या वर गेला की नीट केलेला आहे.)
आणि घरोघरच्या किती मुली अशा झोपू शकत नाहीत, देव जाणे.

कायम शरीराचं भान ठेवायचं, सतत, चोवीस तास, कशी तारेवरची कसरत आहे ही!

मला जाणवलं , मी सुद्धा ही करते, तिच्याइतकी नाही पण करतेच.
मी पॅन्ट, सलवार, घालण्याचा पर्याय निवडीन आणि बिनधास्त झोपीन.
चार लोकात झोपायची वेळ येते, तेव्हा मी गाऊन घालणारच नाही, ( मी घरीही फारसा घालत नाही.) आपल्याला तो सावरायला जमत नाही, हे मला माहीत आहे.

पूर्वी सारखे हात गळ्याशी नेऊन चाचपायची सवय, आतले कपडे आतच आहेत ना? कुठे पट्टी बाहेर तर दिसत नाहीये ना?
साडी नेसली की दहा पिना लावून बंदोबस्त करायचा.

सारखं सांभाळत राहायचं.
मला कंटाळा आला आहे.
मला सोडून द्यायचंय.

*********

बायकांवर किती आणि किती प्रकारचॊ प्रेशर्स असतात.
याची त्यांना जाणीवही नसते.
त्या चालत असतात....
चालत राहण्याची त्यांना सवय असते.

**********



Wednesday, August 15, 2012

वाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..

आता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्या नवर्याला या वर्षी काय वाण मिळेल याची उत्सुकता इकडे लागून राहिलेली आहे. तिकडे आई बाबांची सुद्धा वाण म्हणून द्यायला सोनाराकडे एक फेरी झाली आहे.

का देतात अधिक मासात जावयाला वाण?? कुणाला ठाऊक आहे? इकडे ज्या लोकांना वाण काय मिळणार म्हणून उत्सुकता आहे त्यांना हा प्रश्न विचारल्यावर ते काहीतरी विनोदी उत्तरे देऊन माझा प्रश्न हसण्यावारी नेत आहेत..

मुळात अधिक महिनाच काय? पहिल्या वर्षाच्या प्रत्येक सणाला जावयाला आणि मुलीच्या सासरकडच्या लोकांना काही ना काही दिले पाहिजे असं शास्त्र कोणी काढलं? आणि ते का पाळाव लागतं??

इतक्या का आपण मुली टाकाऊ असतो? कि आपल्यासारखीला आश्रय देणारा जावई महान होय.. त्याला लग्नात हुंडा द्यावा, मग लग्नानंतर पहिल्या वर्षी प्रत्येक सणाला काही ना काहीतरी द्यावे; हे काय कमी म्हणून आयुष्यभर.. म्हणजे अगदी सासू ९८ वर्षाची झाली आणि जावई ७० वर्षाचा म्हातारा झाला तरीही अधिक मासाचे वाण द्यायचे. हे काय कमी म्हणून ती सासू वारली तरी मुलीचा भाऊ वाण देऊन हि परंपरा कायम ठेवतो.

माझा ह्या देण्या-घेण्याला सक्त विरोध आहे. का म्हणून मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या सासरी हे असं सतत देत राहायचं?? आई-वडील जुन्या वळणाचे असल्याने त्यांना "नका देऊ" सांगून पटत नाही. सासरच्यांना नका घेऊ सांगितलेले आवडणार नाही. नवर्याला सांगितले तर तो म्हणतो कि "मला त्यांच्याकडून काहीही नको पण त्यांनी खूप आग्रह केला तर मला त्यांचे मन मोडवणार नाही".

मला नक्की माहितीये कि सध्या माझ्या आई-वडिलांची जावयाला सोन्या-चांदीची वस्तू देण्याची नक्कीच ऐपत नाहीये. त्यांनी पोटाला चिमटा काढून हि वस्तू घेतली आहे. आधीच माझ्या लग्नासाठी बाबांनी खूप कर्ज काढले होते. (मुळात लग्न साधेपणाने करायची आमची इच्छा होती पण मोठ्यांनी ती हाणून पाडली. इकडची (सासरची) माणसे आम्ही लग्नाचा अर्धा खर्च करतो असं म्हणत होते.. पण माझेच आईवडील जुन्या वळणाचे असल्याने त्यांनी लग्नाचा सगळा खर्च ऐपत नसतांना स्वत:च उचलला).

आता मला आई-बाबांकडून काहीही घ्यायला लाज वाटते. ह्या सगळ्या सिस्टीम वरच खूप राग येतोय..

हि कुठली भिकारडी (विवाह) संस्था?? मुलीच्या आईवडिलांच्या पोटाला चिमटे घेऊन त्यांना मुलीच्या सासरकडच्या लोकांचा मानपान करायला लावणारी? मी लग्न केले हे चुकले का?? कि विधिवत लग्न करायची त्यांची (माझ्या आणि नवर्याच्या आईवडिलांची) अट मानली हे चुकले?

खूप कात्रीत अडकल्यासारखे झाले आहे. तुम्ही अश्या प्रसंगातून गेले आहात का? काय केलेत अश्या वेळी? मी काय करू शकते अश्या प्रसंगात?

- आश्लेषा

खरं बोलणं... सांगणं... ऎकणं -- २


खरं बोलणं म्हणजे सत्य असं असतं का? "खरं" म्हणजे आपल्या परीघात, आपल्या परीस्थितीत, आपल्या समजॆनुसार, आपल्या आकलनानुसार जे आपल्याला प्रतीत झालं आहे ते... असं म्हणता येईल. पण सत्य तरी नितळ सत्य असतं का? सत्य हे असं आगीसारखं सार्वकालिक, सर्व परीस्थितीत, सर्व लोकांसाठी एकच, असं नसतं. त्यालाही हे काळवेळेचे डाग असतातच. डाग पण नाही म्हणता यायचं डाग वरवरचे असतात, त्याशिवाय आत सत्य असंही नसतं. सत्याच्या मुशीतच ते आहे.

मग मी म्हणते तेच खरं, तेच सत्य, असं करून नाही चालायचं.
प्रत्येकाचं आपापलं "खरं" असतं, ही मुभा आपण प्रत्येकाला द्यायला हवी.

कृपया हे लक्षात घ्या की इथे मी अतिशय सूक्ष्म बाबींबद्दल बोलत आहे. आपण सरसकट खरं आणि खोटं म्हणतो तसं हे नाही.

म्हणजे प्रत्येकाचं एक (वर दिलेल्या व्याख्येनुसार) खरं असतं.

प्रत्येकाने असा प्रयत्न केला पाहिजे की स्थल/ काल/ व्यक्ती/ दृष्टीकोन/ या पलीकडे आपण किती जाऊ शकू.
आपण जे खरं मानून चाललो आहोत , त्याला किती मर्यादा आहेत, हे समजून घेतलं पाहिजे.

आपल्याला प्रतीत झालेलं "खरं" तरी आपण थेट बोलतो/सांगतो का? तर नाही.
भाषेची एक गंमत असते, वरवर जरी ती सारखीच दिसत असली, तरी समुहानुसार तिचे वेगवेगळे अर्थ असतात.
घराची अशी एक भाषा असते. घरातल्यांनाच तिचे खोल अर्थ लागतात.
दोन व्यक्तींमधेसुद्धा त्यांची त्यांची एक भाषा असते/ असू शकते.

आपण सांगत असतो/ व्यक्त होत असतो ते केवळ भाषेद्वारे नाही. देहबोली ही खूप महत्त्वाची असते.
’भाषा + देहबोली’ ने माणूस पूर्णपणे व्यक्त होतो. ते आपल्याला वाचता आलं पाहिजे.

भावनांची भाषा जगभर सारखी असावी, त्याची तीव्रता कमी जास्त असू शकेल.
म्हणजे मी निखळ भावना म्हणते आहे. आनंद, दु:ख, निराशा....

खरं म्हणजे सर्वसाधारणपणे माणूस जेंव्हा बोलत असतो, तेंव्हा खरंच बोलत असतो.
आपण ते पूर्णपणे वाचू शकत नाही.
आपल्याला ते पूर्णपणे ऎकू येत नाही.

बरेचदा आपल्याला खोटच बोलायचं असतं.
जाणीवपूर्वक.
किंवा आपल्याला सवय असते, बरं वाटेल, पटेल तेच बोलण्याची.
किंवा समाजाच्या चौकटीत आपल्याला सुरक्षित वाटत असतं, समाजाने जे आपल्याकडून अपेक्षिलेलं असतं तेच आपण बोलत जातो.
किंवा खरं बोलण्यासाठी जी किंमत द्यावी लागते ती देण्याची आपली तयारी नसते.
किंवा .....

मला वाटतो आपण सांगीतलं आणि संपलं असं नको, समोरच्या व्यक्तीपर्य़ंत ते खरं पोचलं आहे ना, याची काळजी घ्यायला हवी, निदान आपल्या जवळच्या व्यक्तींपुरती.
आपल्या जवळच्या व्यक्तींपुरतं साधं, स्वच्छ, सरळ आणि खरं जगून पाहूया.
खरं बोलणं म्हणजे स्वत: स्वत:ला स्वीकारणं आहे.

*******

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...