Saturday, January 15, 2011

सासू - सून - मुलगा / नवरा - २

काही खर्‍या गोष्टी लक्षात घेतल्या, परीस्थितीकडे स्वच्छपणे पाहता आलं तर गुंते कमी होण्याची शक्यता असते.

१) सासूबाईंना आई म्हणायची पद्धत पडलेली असली तरी ती आई असू शकत नाही. इतक्या सहज कुणालाही आई होता आले तर ’आईपण’ ते काय राहिले? ती नंणंदेला झुकतं माप देणार, त्यावरून त्रागा करायचं काय कारण? मुलीला एक ड्रेस की सुनेला एक ड्रेस ही समान वागणूक नसते, ते दाखवणं असतं. आई आहे नां ती? नणंदेला तिने बावीस- तेवीस वर्षे वाढवलं आहे, त्या दोघींत घट्ट नातं असणारच. आपण त्यात पडायचं काय कारण?
 मलातरी माझ्या आईने मला झुकतं माप दिलेलं आवडणार आहे, मी जर तिला तिच्या सुनेसारखीच झाले तर मी दुखावली जाईल. ड्रेसची नि बांगड्यांची वाटणी शक्य आहे, प्रेमाचे काय? ( ते मुलीवरच जास्त असणार हे मान्य केल्यावर, इतर गोष्टींचं काय एवढं?)

२) सासू नणंदेची ’आई’ आहे तशी नवर्‍याची ’आई’ आहेच नां? ती त्याच्यावर हक्क सांगणारच आहे. आपलं मुलाने ऎकावं असं तिला वाटणारच आहे. मुलाचं लग्न झाल्यामुळे तिला जरा असुरक्षितता आली असेल, तिचे मेनापॉज चे दिवस असतील, समजून घेऊया तिला. तिने एकाहाती आजवर घर चालवत आणले असेल.... असतील काही कारणं आणखीही... पहिल्यांदा समजूनच घेऊ यात.
 म्हणजे अन्याय सहन करायचा असे नाही. ज्या तडजोडी शक्य नाहीत तिथे ठामच राहायचं, पण वाद चिघळू द्यायचे नाहीत. स्पष्टपणे, शांतपणे आपलं म्हणणं सांगायचं आणि त्याप्रमाणे वागायचं.

३) आपल्या घरात आपल्याला काय हवं आहे, कसं वातावरण.. ते एकदा नवर्‍याबरोबर बसून नीट ठरवायला हवं. प्रत्येक घराचे आपापले नियम असतात, घर त्या नियमांवर चालत असतं. एकदा नियम ठरवले की सगळ्यांसाठी ते सारखे आहेत.

४) नवर्‍याला आपणहून काही कळेल याची वाट पाहू नये, त्याला (आपल्याला) नक्की काय खुपतंय ते स्पष्टपणे सांगीतलं पाहिजे, त्याआधी ते आपल्याला शोधता आलं पाहिजे.

५) काही गोष्टी स्विकारण्यावाचून गत्यंतर नसते, त्या स्विकाराव्या लागल्या याचा त्रास करून घेऊ नये. नवर्‍यालाही काही बाबी अपरीहार्यपणे स्विकाराव्या लागलेल्या असतात.

६) आपण परीपूर्ण (परफेक्ट) नाही हे मान्य करावं. तसं कुणी नसतंच. सासू आणि नवरा हे ही परीपूर्ण असणं शक्य नाही, तेही चुकू शकतात.

७) सासू / नवरा  यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, त्या सांगाव्यात, (सगळ्याच पूर्ण होणार नसतात.) त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यातल्या कुठल्या आपल्याला पूर्ण करता येणार नाहीत / का करता येणार नाहीत याची कल्पना द्यावी.

८) घराचं मनस्वास्थ्य सगळ्यात महत्त्वाचं आहे पण त्यासाठी आपलं स्वातंत्र्य विकायला काढू नये. आपण घर, नवरा, मुलं यांना प्राधान्य देत असलो तरी स्वत:साठी जगणं विसरू नये. (स्वत:च्या मनस्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे.)

यांपैकी काही गोष्टी मला जमतात. काहींसाठी प्रयत्न करते आहे.

माझ्या अनुभवाबाहेरचे, तुम्हांला आस्था असणारे काही मुद्दे राहून गेले असतील. तुम्ही भर घालू शकाल.

------------------------------------

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...