Friday, December 31, 2010

सासू - सून - मुलगा / नवरा

पूर्वी लग्ने होत ती दोन घरांना जोडण्यासाठी, मुलगी कशी आहे, यापेक्षा तिचे घर कसे आहे हेच पाहिले जात असे. दुसरे कारण घरात कामाला एक माणूस आणणे, त्यामुळे शारीरिकदृष्ट्या अव्यंग हवी, इतकी माफक अपेक्षा असे. दिसायला चांगली असली तर छानच, पण तो काही महत्वाचा निकष नसे.
 त्यामुळे घरात येणार्‍या सुनेची कर्तव्ये केवळ नवर्‍यापुरती मर्यादित नसत, तर घरांप्रती, म्हणजे सासू-सासरे-दीर-जावा-नणंदा अशा सगळ्यांसाठी असत. नवरा एकटा शहरात नोकरीसाठी असला तरी सासू-सासर्‍यांसाठी गा्वात राहणार्‍या कितीक सुना दिसून येत. सासू-सासर्‍यांचं करतोय, धाकट्या दिरांनणंदांचं करतोय म्हणजे म्हणजे परक्या कुणाचं करतोय अशी भावना नसे.
 शहरांमधे नवनव्या नोकर्‍या तयार होऊ लागल्या, कारखाने, उद्योगधंदे वाढले, खेड्यातल्या घरांच्या शाखा शहरात आल्या, तशी ही एकत्र कुटूंबपद्धती जाऊन त्याजागी विभक्त कुटूंबपद्धती आली. पण पूर्णत: विभक्त नव्हे, दिरांची, नातेवाईकांची मुले शिक्षणासाठी या विभक्त कुटूंबातून असत, भावना ही की सोय म्हणून हे शहरातले घर आहे पण मूळत: त्या घराचा हिस्साच आहे.
 हळूहळू पूर्णत: विभक्त कुटूंबे आली. आता तर मुलगा आणि वडील एकाच गावात वेगवेगळ्या घरात राहात असलेले आपण पाहतो.

या प्रत्येक कुटूंबपद्धतीचे आपापले फायदे-तोटे आहेत.

तर आता सुनांची कर्तव्ये बदलली आहेत. सून घरात मुलासाठी, त्याच्या पसंतीने, त्याला साजेलशी आणली जाते. सुनेची कर्तव्ये आता बहुतांशी बायको म्हणून, आई म्हणूनच आहेत. सुनेच्या डोक्यातही हे पक्के होत जात आहे, की नवरा, मुले तेव्हढी आपली. सासू सासर्‍यांचं करणं भाग आहे, इतरांचं मी केलं तर ते जास्तीचं तो काही माझ्या कर्तव्याचा भाग नाही.
 आपले नवरे आणि आपणही अशा विभक्त कुटूंबात वाढलो आहोत. अर्थातच नवर्‍याची आई नवर्‍यात खूप गुंतलेली आहे. त्याला वाढवण्यात तिचा बर्‍यापैकी सहभाग होता. आता तिच्या आपल्या मुलाकडून काही मागण्या असणे स्वाभाविक आहे.
इतक्या वर्षांनी मुलाच्या राज्यात तिला काही अधिकार मिळाले आहेत आणि ती वापरते आहे.
.......
जसजशी समाजरचना बदलत जाते, कुटूंबपद्धती बदलत जाते, तसतशी नाती बदलतात. आपल्या नवर्‍याकडून काय नि सासूकडून काय, ज्या अपेक्षा असतात त्या समाज ठरवत असतो, निरपेक्षपणे आपण काहीही ठरवत नाही....
हा प्रकाश डोक्यात पडला नां, की हताश व्हायला होतं.
.........
घरात आलेली सून तर मुलासाठीच आलेली आहे, ती आपल्या नवर्‍यावर म्हणजेच सासूच्या मुलावर प्रेम करत असते, दोघीही त्याच्यावर प्रेम करत असतात म्हणजे काय तर मालकीहक्क दाखवत असतात.
 हा नवरा/ मुलगा काय करत असतो? बहुतेकदा तो काहीही करत नाही, किंवा काहीच करत नाही.. प्रेम वगैरे .. मर्यादा असतात माणसांच्या ...पुरूष असण्याच्या... स्त्री असण्याच्या..
 ही सासू आहे नां! ती आयुष्यभर आपल्या नवर्‍याला, मुलांना धरून बसली आहे. समाजाने, तिच्यासाठी हेच काम नेमून दिलेलं होतं. तिने स्वत:ची वाढच करून घेतलेली नाही, (हे मी शिक्षणाच्या संदर्भात बोलत नसून नातेसंबंधांच्या संदर्भात म्हणत आहे.)
 उदा. मुलासाठी आटापीटा करून एखादा पदार्थ करणे....’ यातच माझ्या जीवनाचे सौख्य़ सामावले आहे’.... अगं बाई, हे असं नाही गं! माणसाची गरज केवळ खाणे एवढीच नसते.
 आपण मुलासाठी / नवर्‍यासाठी जे असं करतो ते मिरवण्याची गरज का भासते? कारण त्यावेगळं काही भरीव आयुष्यात नसतंच ना!
....
सगळ्या सासवांकडेच बोट दाखवण्यात अर्थ नाही. काही घरात सूनवास असतो
......

आपणतरी सासवांसारखे होणे टाळू या. कुठली गोष्ट किती मोठी करायची हे आपल्यावर अवलंबून असते. स्वयंपाकघरातले वाद टाळू या. ती फार महत्वाची बाब आहे असं आपण समजायचंच नाही.
 नातेसंबंधांचा विकास करू या. एकट्या नवर्‍यावर अवलंबून राहणे सोडून देऊ.
आई-मुलगा आणि नवरा-बायको या नात्यांमधे आईमुलाचे नाते खोलवर पोचणारे असू शकते पण नवरा-बायकोचे नाते हे अधिक मिती असणारे, सर्वांगांनी फुलू शकणारे असे आहे. ( आपण ते फुलवत नाही, हे सोडून द्या.) हे सासवांनी स्वीकारायला हवे.
....
वादामधे मुलग्याने/नवर्‍याने मधे पडावे अशी दोन्ही बाजूंची इच्छा असते. कुठल्याही असल्या घरगुती वादांमधे न्याय देणे ही फार अवघड गोष्ट असते. सामोपचाराने पुढे जात राहणं याला काही पर्याय नसतो. कटूता टाळावी.
मुलगे किंवा त्यांचे वडील या पुरूषांनी परीस्थिती सुधारावी म्हणून काहीच प्रयत्न केले नाहीत तर ती चिघळत जाते. बरेच वाद हे घटनेवर पुरूष काय प्रतिक्रिया देतात यावरून घडतात. (घरातले सत्ताधारी तेच असतात ना?)
 ....
घराचे मनस्वास्थ्य सांभाळणं हे माझ्यामते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी काही गोष्टी सोडून देऊ, काही कानाआड करू, काहींसाठी ठाम राहू पण घर हसतं/ बोलतं/ प्रसन्न असायला हवं. आपल्या घरात छोटी मुलं आहेत, त्यांचं बालपण टिकवायला हवं.

2 comments:

  1. आपणतरी सासवांसारखे होणे टाळू या. कुठली गोष्ट किती मोठी करायची हे आपल्यावर अवलंबून असते. >> असं म्हणून सोडून देता येत नाही.. सासूला रोज घरच्यांना सगळ्यांच्या आवडीचा एक असे रोज चार चार पदार्थ.. किंवा प्रत्येकाच्या आवडीची एक याप्रमाणे रोज चार भाज्या बनवायची सवय असेल.. किंवा तिने " मुलासाठी आटापीटा करून एखादा पदार्थ करणे....’ यातच माझ्या जीवनाचे सौख्य़ सामावले आहे’.. " असं समजून त्यांना खाऊ-पिऊ घालण्यातच धन्यता मानली असेल.. तर घरातल्या सगळ्यांना तीच सवय असते.. आवडेल तेच खाण्याची.. नसेल आवडत तर सरळ नावे ठेवण्याची.. आणि सारे आयते हातात मिळण्याची.. त्याचे काय करायचे?

    ReplyDelete
    Replies
    1. हं. या गोष्टीचा त्रास होत असणार.
      आणि घरतले सगळे त्याच विचाराचे असतील तर वेगळा विचार करणार्‍या एकटीला आपले मत पटवून देणे अवघड होते.

      हताश व्हायचं नाही. आपले आपण काही मार्ग काढले पाहिजेत.
      १) स्पष्ट्पणे आपलं मत मांडणं, आणि तरीही या घरातल्या बहुसंख्यांची ही रित आहे म्हणून मी हे चालवून घेते/ या पद्धतीने वागते, याची जाणीव करून देणे. (लग्न झाल्या झाल्या घर सुनेच्या पद्धतीने चालणार नाही, हे आपणही लक्षात घेणे.)
      २) काही बदल ठामपणे करणे. समजा आयतं हातात मिळण्याची सवय... ही बदलायचा प्रयत्न करायचा. स्वत:च्या बाजूने आयते हातात देणे हळूहळू थांबवत आणायचे. (शक्य झाले तर)
      ३) आपण या गोष्टीला महत्त्व द्यायचे नाही, ती मोठी करायची नाही. म्हणजे काय करायचे तर या कारणासाठी स्वत:ला दुखवून घ्यायचे नाही.
      ४) आपले छंद आपल्या आवडी जोपासायच्या, त्यासाठी आवर्जून वेळ काढायचा.

      सोपे नसते काहीच! पण प्रयत्न तर करायलाच हवेत ना!

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...