Friday, October 15, 2010

कमावतं / न कमावतं असणं

तुमचे  स्थान हे तुम्ही कमावतं असण्यावर अथवा नसण्यावर अवलंबून आहे असे तुम्हाला वाटते का?

दीपा, घरातले स्थान हे कमावतं असण्या नसण्यावर अवलंबून असते, समाजातले स्थान अवलंबून असते.

घरातले स्थान म्हणजे तुला काय अपेक्षित आहे?
घरात एक अधिकारांची आणि जबाबदार्‍यांची उतरंड असते, सगळ्यात वरचे स्थान घरातल्या कर्त्या पुरूषाचे असते, त्याखालोखाल त्याच्या बायकोचे मग मुले.... निर्णय घेण्याचे काम हा पुरूष करत असतो. आर्थिक बाबतीतले, मुलांच्या बाबतीतले ( किती हवी.), तू लिहीलेस तसे घर, गाडी याबाबतीतले...... आपण ज्या स्तरात आहोत, त्या स्तरात हे सगळे निर्णय पुरूष एकतर्फी घेत असतील असं मला वाटत नाही. शेवटचा शब्द पुरूषाचा असेल पण दोघांच्या विचारानेच ठरत असणार.
  आमच्या घरात हे निर्णय कुणी एकतर्फी घेतले नाहीत. सर्वत्र मधील घर घेतले तेंव्हा मी ओरंगाबादला होते आणि मी ते पाहिलेलेही नव्हते पण मिलिन्द माझ्याशी फोनवर बोलला होता, असेही ते घर तात्पुरते आहे, हे आम्हांला माहित होते, आम्ही चर्चा वगैरे काही केली नाही. सध्याचे घर घेताना मात्र माझ्याच खूप अटी होत्या आणि मीच घरे बघत होते. आम्ही दोघांनी बसून बजेट किती आणि घर केव्हढे, कुठल्या परीसरात असं नक्की केलेलं होतं. मिलिन्दच्या फारशा अटी नसल्यामुळे त्याला दहा घरांमधलं एक पसंत पडलं असतं, मी शंभरेक घरे पाहिली असतील, त्यातील निवडक मिलिन्दने पाहिली (मी मागे लागले म्हणून) जाहिराती पाहणे, एजंटांना फोन करणे, प्रत्यक्षात घर पाहणे, बोलणी करणे हे सारं मीच करत असे, अर्थात रोजचं रोज मिलिन्दला सांगत असे. पुढेही अंतर्गत संरचनेच्या कामात मी बुडालेली होते, तेव्हा तर दोन-तीन महिने मिलिन्द सिडनीला होता, चार-सहा महिन्यांच्या सुहृदला घेऊन मी हे काम पाहात होते. सर्वत्रचं घर विकतानाही मिलिन्द येईल त्या किमतीला शेजार्‍यांना घर द्यायला तयार होता, मला घर घेताना एकूणच या व्यवहारांची माहीती झाल्यामुळे मी त्याला थांबवले नंतर जरा बर्‍या किमतीला आम्ही ते विकले. या सगळ्या कामांच्या वेळी मी कमावत नाही म्हणून तसा काही फरक पडला नाही, मलाच मी कमावत असते तर ओढाताण कमी झाली असती, संसार दोघांचा असताना एकट्यानेच त्याने का सगळे करायचे, या विचारांचा त्रास झाला.
  गाडीचे म्हणशील तर मला त्यातले काही कळत नाही, गाडी कितीशी वापरली जाते? सोय म्हणून छोटी असली तरी चालणार आहे इतकंच मला कळतं. पण म्हणून मिलिन्द मला त्यातलं सांगत नाही असं होत नाही.
  याशिवाय गुंतवणूक वगैरे यातलं काही मला कळत नाही. माझी वहिनी हे सगळं पाहते, बर्‍यापैकी कमावतेदेखील, मला खरोखरच हे जमण्यातलं आहे असं आतून वाटत नाही. शेअर्स वगैरे तर जाऊदे पण बॅंकेच्या व्यवहारातलं देखील मला काही कळत नाही, ATM सुरू झाले , माझी फारच सोय झाली. मी मिलिन्द सांगेल तिथे नुसत्या सह्या करत असते, हे काही बरोबर नाही, हे व्यवहार समजून घ्यायला हवेत, ते मी करत नाही. मी कमावत असते तरी मी हे केले नसते, सध्या मिलिन्द कमावतो मग तो बघेल त्याच्या पैशांचे काय करायचे ते!, असे मनाच्या कोपर्‍यात असते हे खरेच आहे, मी जर सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायचे असे ठरवले तर मिलिन्द आनंदाने ते माझ्याकडे देईल, तसे तो म्हणतोही, मलाच हे नको आहे.मला ते जमणारे नाही.
-------
२) तुम्ही कमवते असण्या/नसण्याचे फायदे तोटे...............
कमावते नसण्याचे फायदे---- कमावण्यासाठी बरेचदा नावडीचे काम करत वेळ घालवावा लागतो, ते मला करावं लागत नाही.
                       अर्थातच आवडीचे अनेक उद्योग करायला वेळ मिळतो.
                        मुलांजवळ राहायला मिळतं, त्यांच्याकडून शिकायला मिळतं. मुलांबरोबर मजा येते.
                        नोकरीतले ताण नाहीत.
कमावते नसण्याचे तोटे----- आर्थिक परावलंबन,
  ------                        
  बाहेरील व्यक्ती तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतात. याचा तुमच्यावर होणारा परीणाम........
  
 लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कौतुक + कीव  असा असतो. एवढी शिकली, चांगली नोकरी करत होती आणि मुलांसाठी घरी बसली, वा!  किंवा कसं ना बायकांना कितीही शिकल्या तरी घर/ मुलं काही सुटत नाहीत वगैरे.
 मुलांसाठी नोकरी सोडली हे काही पूर्णपणे खरं नाही. माझी नोकरी जनरेशन मधे होती, पुण्यात बदली होणे शक्य नव्हते, आम्हांला दोन घरे करायची नव्हती. मी नाशिकला आणि मिलिन्दनेही नोकरी बदलून नाशिकला यायचे असा एक  पर्याय उपलब्ध होता पण दोघांनांही पुणे सोडायचे नव्हते, मला नोकरी सोडण्याशिवाय पर्याय नव्हता, पुण्यात बदली झाली असती तर मुलांना पाळणाघरात ठेवत कदाचित मी करत राहिलेही असते. मुले शाळेत जाईतो मुलांकडे कोणीतरी पूर्णवेळ लक्ष दिले पाहिजे असेही आमचे नक्की होते, माझे नोकरी सोडणे ही केवळ तात्पुरती व्यवस्था होती, ती लांबत गेली आता तर मी काही उद्योग (कमावण्याचा) करीन की नाही कोण जाणे. आमच्या संसाराला माझ्या कमावण्याची काही गरजच नाही. :(
  मी जर पुरूष असते तर घरी बसण्याचा मी त्रास करून घेतला नसता. (अवचटांसारखा), पण बाई असल्यामुळे लोक मला गृहित धरतात, मिलिन्द घरी राहिला असता तर ती त्याची निवड ठरली असती.
 लोकांच्या अशा पाहण्याचा मला कधीकधी त्रास होतो मग मी वस्तुस्थिती काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करते, लोकांना ते ऎकून घ्यायचं नसतं, त्यांची मते पक्की असतात. हल्ली मी ते ही करत नाही, कधीकधी त्यांच्या म्हणण्यात तथ्य असतं.
 माझ्या घरी बसण्याने ”घर/मुले हीच बाईची प्राथमिक आणि नैसर्गीक जबाबदारी आहे” हे अधोरेखित होतं, चुकीचे संदेश नातेवाईकांमधे/ आजूबाजूच्यांकडे जातात. .............. याचं मला वाईट वाटतं.
---------

आपण निदान स्वत:पुरते पैसे कमावलेच पाहिजेत. तेवढं घरकाम मी करत असेनच. माझा आर्थिक भार मी नक्कीच मिलिन्दवर टाकत नाही. शिवाय मुलांसाठी वेळ देते, नातेवाईकांसाठी वेळ देते. घर भावनीकदृष्ट्या बांधते, आमच्या घरात, घरातल्यांनाच नाही तर येणारांना मोकळेपणा आणि आपुलकी जाणवावी याची काळजी घेते. नातेवाईकांशी, आप्तांशी (परराष्ट्रधोरण) समाधानकारक पातळीवर संबंध ठेवते. त्यांच्या अडी-अडचणींसाठी उपलब्ध असते. समाजाच्या एका कुटूंबाकडून ज्या ज्या मागण्या असतात त्या पुर्‍या करते. अर्थात हे सगळंच मी एकटी करते असं नाही, मिलिन्दही असतोच, (माझ्या उत्साहाला आवर घालण्याचं महत्त्वाचं काम त्याच्याकडेच आहे.) घर जे बांधत आणलं आहे ते दोघांनी मिळूनच, पण मी माझा वेळ त्यासाठी दिला आहे. ( या मुद्द्यावर मिलिन्दला कधीकधी मी emotionally blackmail  करते.)
 कमावणं तर महत्वाचं आहेच पण त्याहीपेक्षा आपल्यावरचं समाजऋण फेडायचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आपण जे उभे असतो ते आधीच्या पिढ्यांच्या खांद्यावरच ना? लेखनकलेचा शोध लावणार्‍यांची मी ऋ्णी आहे, (नाहीतर मी काय केलं असतं?), वेगवेगळ्या कलांमधे जे काम करून ठेवलंय त्यांचं माझ्यावर ऋण आहे, वेदनाशामक औषधांचा आणि विशेषत: गर्भनिरोधनाच्या साधनांचा शोध लावणार्‍यांची मी ऋणी आहे, स्त्रियांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांची मी ऋणी आहे. हे ऋण थोडंफार फेडण्याचा प्रयत्न मी/ प्रत्येकानेच केला पाहिजे.

_____

दीपा, माझ्ं घरातल्ं स्थान माझ्या कमावतं असण्या नसण्यावर अवलंबून नाही.
पण माझ्या मनातलं माझं स्थान विचारशील तर आहे.
कधी कधी मी वैतागते, माझी चिड्चिड होते, मला सगळ्यांचा कंटाळा येतो, मी विचार करते नोकरीत तरी काय? मी निर्रथक कामे करीत राहिलेच असते ना? केवळ महिन्याला पैसे मिळत राहिले असते.
 त्यापेक्षा गेल्या काही वर्षांमधे किती आवडीच्या गोष्टी मला करून पाहता आल्या, शिकता आल्या , शिकत राहण्याइतकं आनंदाचं दुसरं काही नाही, नोकरीत हा आनंद मी गमावलाच असता.
 हे सगळं मी करू शकतेय ते मिलिन्द पुरेसं कमावतोय म्हणून....
पण तो नसता नां पुरेसा कमावत तरी मला आवडलंच असतं.

--------

एक महत्त्वाचं राहिलंच. कुठलेही घर हे आर्थिकदृष्ट्या एकखांबी तंबू असू नये. त्यासाठी दोघांनीही कमावणे गरजेचे आहे. असंही जोवर दोघंही कमावत नाहीत/ बरोबरीने कमावत नाहीत तोपर्यन्त घरात पूर्णपणे समानता शक्य नसते.

---------

3 comments:

  1. >> नोकरीत तरी काय? मी निर्रथक कामे करीत राहिलेच असते ना?
    >> केवळ महिन्याला पैसे मिळत राहिले असते. त्यापेक्षा गेल्या काही
    >> वर्षांमधे किती आवडीच्या गोष्टी मला करून पाहता आल्या,
    >> शिकता आल्या , शिकत राहण्याइतकं आनंदाचं दुसरं काही नाही,
    >> नोकरीत हा आनंद मी गमावलाच असता.

    कमावणं म्हणजे नोकरीच आणि ती ही निरर्थकच असा विचार का करावा? आवडीच्या गोष्टींतून अर्थार्जन का करू नये?

    ReplyDelete
  2. ज्या घरात एकच व्यक्ती कमावती आहे, तेथे ती कमाई त्या एकाच व्यक्तीची का मानावी? घरात (एकूणच समाजात) "कामाची विभागणी" हे तत्व महत्वाचं आहे. तेव्हा कमवून आणणे ही एका व्यक्तीची केवळ जबाबदारी झाली, पण त्या कमाईवर घरातील सर्वांचा वाटा (केवळ पत्नीचा नाही तर मुले आणि घरातील इतरांचाही) मानावाच लागेल.

    टाटाची नॅनो १ लाखाला विकली म्हणून काय ते १ लाख विक्रेत्याचे नाही झाले. विकेता Profit Center. एकूण Value Addition मधील केवळ एक दुवा. पण संशोधन, उत्पादन वगैरे Cost Centers देखील महत्वाची आणि गरजेची.

    माझ्यामते घरातील प्रत्येकाच्या Value Addition मोजून त्याप्रमाणे विभागणी केली पाहिजे. पण ते शक्य नसेल तर (नाहीच; मुलांना दिलेल्या वेळाची कशी किंमत करायची?), बहुतेक कुटुंबात पत्नीचा वाटा पतीपेक्षा जास्तच आणि किमान पतीइतका तरी धरावाच लागेल.

    ReplyDelete
  3. नीरजचे मत विचार करायला लावणारे आहे.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...