Wednesday, September 15, 2010

भांडण - १

मिलिन्दच्या कंपनीच्या डायरेक्टरने दिलेली पार्टी होती. त्यासाठी आम्ही गेलो होतो. कशावरून तरी आमचं भांडण झालेलं होतं. त्यामुळे कार्यक्रमाच्या इथे मी उसनं हसू आणून (सहजपणे) वावरत होते. नुकतंच आमचं लग्न झालेलं होतं, मिलिन्दच्या सहकार्‍यांना आणि सहकारीणींना त्याची बायको पाहायची उत्सुकता होती. मिलिन्दच्या बॉसच्या बॉसच्या बॉसलाही मला भेटायचं होतं. माझा हात अगदी हातात धरून ते मला म्हणाले,” तू किती लकी आहेस, तुला माहित आहे का? तुझा नवरा किती चांगला आहे......” मी पुन्हा हसले. हो + खरं की काय? असं. आता त्याच्या कौतुकाचं मला अजीर्ण होत आलेलं. कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो आणि मी पुन्हा भांडणाचं चॅनेल लावलं. लकी?? ह्याला कधी कोणी म्हणत नाही लकी! मीच कायम लकी? मी म्हणाले, ” तू कितीही चांगला असलास तरी नवरा म्हणून कसा आहेस हे जगात मी एकटीच सांगू शकते, ते इतरांनी ठरवायचं कारण नाही.” मिलिन्द म्हणाला,” तू सोडून दे. ते त्यांचं मत आहे.” ..... भांडणातली महत्वाची गोष्ट आहे सोडून देणे. ही शिकायला मी खूप वेळ घेतला.
 वाद घालायला, भांडायला मला आवडतं. पण समोरचा नीट तर्कसुसंगत बाजू मांडत असेल तरच! नाहीतर लोक इतक्या उड्या मारतात इकडून तिकडे, स्वत:च्या बाजूच्या विरोधातले मुद्दे मांडतात आणि तसे ते आहेत हे ही त्यांच्या गावी नसतं. पूर्वी मी वैतागायचे, त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ होतो, हे सांगू पाहायचे. आता सोडून देते.
 भांडणातली दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ’भांडण म्हणजे गणित नाही, जे सोडवता येईलच आणि त्याचं काहीतरी उत्तर असेलच असं नाही.’ तरीही भांडायची एक तर्कशुद्ध रीत आहे.
 माझी एक मैत्रिण आधी पुण्यात होती, नंतर मुंबईला गेली. तिचे अधून मधून फोन येतात. एकदा नवर्‍याशी भांडण झालं, पुन्हा मूळ पदावर येण्याऎवजी बिनसतच चाललं. आधी आणखी एक सांगते, तिचं लग्न झालं आणि सुरूवातीच्या दिवसांतच ती सासरच्या, नवर्‍याच्या काही साध्या तक्रारी माहेरी आई-बाबांना सांगायला लागली तेव्हा ते म्हणाले,’ तुझं लग्न करून दिलं, आमचा संबंध संपला, आता हे आम्हांला सांगायचं नाही, तुझं तू बघायचं’ .... ती अस्वस्थ होती. मी सगळं फोनवरून ऎकत होते. तेव्हा मी नुकतंच समाजशास्त्रावरचं एक पुस्तक वाचलेलं होतं. त्या पद्धतीने बोलून पाहा असं मी सुचवलं. १) दोघेही रागात/ चिडलेले असताना काही बोलायचं नाही. आधी एक वेळ ठरवून घ्या आणि शांतपणे त्या वेळी या विषयावर बोला. २) फक्त याच विषयावर बोला, जुन्या घटना उकरून काढू नका, या निमित्ताने जुने हिशोब चुकते करणे, असे करू नका. ३) विरोधासाठी विरोध नको, समोरच्याचे योग्य म्हणणे, आपल्या चुका, मान्य करा. ४) समोरच्याचे म्हणणे पूर्ण्पणे ऎकून घ्या. आणखीही दोन-चार मुद्दे असतील, मी हे स्मरणातून लिहिले आहेत...... खरोखरच त्यांचं भांडण मिटलं. जणू काही जादू करून हे मुद्दे मी तिला काढून दिले! मी तिला म्हणाले, ”हे पुस्तकातलं आहे, तुझ्या निमित्ताने ते काम करतं हे सिद्ध झालं.” मागे दीपाने साठ्यांचं एक मेल फॉरवर्ड केलेलं, त्यातही असंच काहीसं होतं. अशा पद्धती पुस्तकांमधून कुठे कुठे असतातच, आपण त्या वापरतो का हा प्रश्न आहे.
 ही रीत जर दोन्ही बाजूंना भांडण मिटवायचं असेल तर उपयोगी पडते.
बरेचदा भांडणाची कारणं वरकरणी दिसतात ती नसतातच. सल कुठे आहे हे आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. नाहीतर भांडणे दिशाहीन होत जातात. अबोला हे काही कुठल्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. भांडण ही तर नात्यातल्या जिवंतपणाची खूण आहे.

********

आम्ही जेव्हा लष्कराच्या भाकरी भाजत असतो, म्हणजे घराबाहेरच्या मुद्द्यांवर मतभेद (कसला भारी शब्द आलाय ना? वरती सुचलाच नाही!) असतात तेव्हा व्यवस्थित वाद घालतो/ भांडतो. घरगुती प्रश्नांवरची आमची भांडणे एकतर्फी असतात. मिलिन्दला काही प्रश्नच नसतात आणि मला तर प्रश्नच पडत राहतात. थोड्या वेळाने मी भिंतीशीच भांडतेय असा ऎकणार्‍याचा समज होईल. पण संतपुरूषांची (आदरार्थी बहुवचन) एक तर समाधी लागते, असाही त्यांना काही फरक पडत नाही. ते कधीही रागावत नाहीत/ चिडत नाहीत/ त्यांचा स्वरसुद्धा चढा लागत नाही. भांडून झाल्यावर (एकतर्फी) मलाच काय आपण संतमहात्म्याशी भांडतो असं होऊन जातं....... तर सांगायचा मुद्दा हा की भांडणावरचा रामबाण उपाय म्हणजे शांत बसा. आमच्या घरी हे सिद्ध झालेलं आहे.

******

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...