Tuesday, June 15, 2010

चरे

आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो. संध्याकाळी समुद्रावर. तिथे बरीच गर्दी होती. तरीही आम्ही आपापल्या परीने मजा करत होतो. मुक्ता आणि सुहृद तर सुटलेच होते. मीही आजूबाजूचे आवाज कानाआड करण्याचा प्रयत्न करत होते. तिथल्या एखाद्या खडकावर बसून काही आठवावं....भूमातेच्या चरणतला तुज धुतां .... शक्य नव्हतं. किंवा इथून सरळ दक्षिणेला जात राहिलो तर भूमी म्हणजे अंटार्क्टिकाच, पश्चिमेला गेलो तर सोमालीया....असा विचार करत बसावं..शक्य नव्हतं. आपल्याकडे शांततेने काही अनुभवताच येत नाही.

समोर अफाट पसरलेलं पाणी..त्याचे बदलते रंग...पायांखाली सरकणारी वाळू...मी पाण्यातल्या एका दगडावर जावून बसले. आवाज जरा दूर गेलेले. आणखी एक बाई माझ्या शेजारच्या दगडावर येऊन बसल्या, त्यांनी मुलाला बोलावलं. कॉलेजात जाणारा त्यांचा मुलगा आणि नवरा पण आला. मराठीच लोक होते. मुक्ताही आली. आम्ही दोघी पाण्यात पाय घालून बसलो. इतक्यात त्या बाईंची चप्पल पाण्यात वाहून गेली. त्यांचा तो नवरा खेकसला,’ साधी चप्पलही सांभाळता येत नाही का?’ आणि अजून बरंच काही. त्या कसानुंसा चेहरा करून बसल्या. एक शब्दही बोलल्या नाहीत, की आपली बाजू मांडली नाही. इतक्या वर्षांच्या संसारानंतर एक चप्पल वेंधळेपणाने हरवावी, इतकीही पत त्या बाईने कमावली नव्हती.

समोर अफाट पसरलेलं पाणी..त्याचे बदलते रंग...पायांखाली सरकणारी वाळू.....त्या माणसाचा खेकसणारा आवाज....... माझ्या अनुभवावर त्या सद्गृहस्थाने एक चरा पाडून ठेवला.

******************

तीन-चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी, मुक्ता आणि सुहृदच होतो घरी. रात्रीचे साडेदहा वाजले असतील. फोनची रिंग वाजली. मुक्ताने उचलला, म्हणाली,’ आई, काही कळत नाहीये.’ मी फोन हातात घेतला, विचारलं,”कोण पाहिजे?” ” प्यारी, आय लव्ह यू, आपकीही राह देख रहे है” रिसीव्हर ठेवेपर्यन्त मी एव्हढं ऎकलं. तीन-चार जणं असावेत, पार्श्वभूमीला बोलणं, गाणं ऎकू येत होतं. मला त्या आवाजाची किळस आली. मुक्ताने काय ऎकलं होतं?? मी तिला पुन्हा पुन्हा विचारलं. तिला काहीही कळलं नव्हतं. पाचच मिनिटात पुन्हा फोन आला, वाजत राहिला, दुसर्‍या कुणाचातरी असेल, मी उचलला, तीच पार्श्वभूमी, एक शब्दही न ऎकता मी फोन ठेवला. चिडले, धीटपणे पुन्हा फोनची वाट पाहात राहीले, दोनेक मिनीटंच.. लक्षात आलं पुन्हा तो आवाज ऎकण्याइतकी मी धीट नाही. फोन काढून ठेवला.

खरं मी छान मूडमधे होते, विन्दा दीडदा साठी फुलांचे मुखवटे करत होते. त्या एका फोनने सगळं बदलून टाकलं.

मुलं झोपेला आली होती, त्यांना झोपवलं. काम बाजूला ठेवलं, झोपायचा प्रयत्न करत होते, शक्य नव्हतं. आमच्या गच्चीचं दार आम्ही कधीही लावत नाही. उठून ते लावलं, त्याला कुलूप लावलं, समोरच्या दाराची कडी नीट लावलीये ना? पाहून आले. त्यात लॅचची किल्ली घालून ठेवली म्हणजे बाहेरून कुणाला लॅच वापरता येणार नाही. मी अस्वस्थ होते? ठीक आहे... घाबरले होते? का? माहीत नाही.

हे सरळच होतं की त्या माणसांनी कुठलातरी एक नंबर फिरवला तो आमचा निघाला. त्यांना मिलिन्द परदेशी गेला आहे, हे माहीत नसणारच. मग का??

तासाभरानंतर मी जरा ठीक झाले. त्या आवाजाचा त्रास होत होताच. ऎकलेल्या शब्दांचे अर्थ मी लावत नव्हतेच.... मिलिन्द असता तर इतका त्रास झाला नसता. त्याला नेहमी सोपी उत्तरं सापडतात. नुसतं त्याच्याशी बोलता आलं असतं तरी बरं वाटलं असतं. मला बोलायला, चिडायला, रडायला कोणीतरी हवं होतं, आईला बोलून काय सांगणार होते? इतक्या रात्री आणखी कुणाशी बोलू शकणार होते? मिलिन्द तीन-चार दिवसांनी येणार होता.

कुठल्या विकृत माणसांसाठी मी माझी मनस्थिती का बिघडून घेत होते?

पुन्हा पूर्ववत व्हायला मला पुढचे चार दिवस लागले.

एक चरा पडला तो पडलाच.

*************

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...