Friday, May 28, 2010

मैत्री..... मनाला हवीहवीशी.

माझ्या आयुष्यात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा कोणाशी मैत्री होते तेव्हा समोरची व्यक्ती स्त्री आहे का पुरुष याचा विचार करुन कधीच होत नाही.मला वाटते लहानपणापासून आपण कसे वाढवलो गेलो यावर ते अवलंबून असते. याबाबतीत विचारांनी माझी आई खुप सुधारीत होती. आणि बाबांचे विचार त्यामानाने मागासलेले.आईने लहानपणी आम्हाला सर्व जातीचे, सर्व थरांमधील, मित्र-मैत्रीणींशी मैत्री करायला हवी ती मोकळीक दीली.त्या मैत्रीच्या सीमारेषा,त्यातील फायदे तोटे,धोके हे वेळोवेळी त्या त्या वयानुसार समजावून सांगितले. त्यामुळे समाजाची कधीच भीती वाटली नाही. यात आमचे बाबा,नातेवाईक,सोसायतीतील इतर मंडळी हे सर्वजण मोडत होते.कारण त्या मैत्रीवर पूर्ण विश्वास असणारी माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.आणि हाच विश्वास व आमच्या नात्यातील पारदर्शकता ही कोणत्याही वयात, कोणाशीही होणारी मैत्री टीकवण्यात होते.या आमच्या नात्यातील जमेच्या बाजूंमुळे मला लहानपणी,कॉलेजमध्ये मित्र मैत्रीणींची संख्या भरपूर होती.आणि त्यातही मित्रांच्या संख्येचे प्रमाण जास्त होते.लग्नाआधी आम्ही रात्री दहादहा वाजेपर्यंत गप्पा मारायचो,एकत्र फोटोग्राफीला जायचो,एकत्र स्केचिंग करायला जायचो.
एकत्र कुटुंबात लग्न करुन आल्यावर नवरा म्हणून कौस्तुभचा अंदाज यायला खूप वेळ लागला.याला एकत्र कुटुंबातील घरातील अनेक कारणे होती. त्यामुळे मित्रांशीच बोलणे केले.तो मला जास्त सोपा मार्ग वाटला.त्या मित्रांनीही माझी बाजू समजावुन घेऊन काही वर्ष फोन नाही केले,न भेटण्याचे ठरवले.आता गेली तीन एक वर्षांपासून आमच्या बॅचमधले मित्र-मैत्रीणी आम्ही एकत्र दोन एक महीन्यातुन एक दीवस भेटत असतो.घरी माझ्या जुन्या मित्रांचे फोन येतात.त्याबद्दल कौस्तुभला माहीतीही आहे.वेळोवेळी त्याची मित्रांशी ओळखही करुन दीली जाते.आता समाजाची भिती अजिबात वाटत नाही. एकत्र कुटुंबात कोण काय म्हणेल याचा मनावर ताणही येत नाही. कारण कोणतीही आमच्या मैत्रीमधील गोष्ट माझ्याकडून लपवली जात नाही.
परवाच मी मुलांना घेउन बालगंधर्वला प्रदर्शन बघायला गेले होते.मी त्या वस्तू आणि त्याची माहीती वाचण्यात गुंग होते. एवढ्यात मागून मला कोणीतरी ट्प्पल मारली. वळून मागे बघते तर माझा कॉलेजचा मित्र होता.क्षणभर मी ही चक्रावले. कारण त्याच्या वयाने म्हणा मी त्याला पटकन ओळ्खले नाही.वेगळ्या स्टाईलची मिशी,रहाणीमान सर्वच बदललेले होते. त्याच्याशी दहा मिनीटे गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना स्मृतीचा चेहरा कावरा बावरा झालेला दीसला.मी ओळखले आणि मुलांची ओळख त्याच्याशी करून दीली.नंतर आम्ही घरी आलो आणि दारातच स्मृतीने मला विचारलं तो मगाशी तुला टप्पल मारणारा माणूस कोण होता?तिचा मगाशी झालेला कावराबावरा चेह-यामागचा प्रश्न आता तीने मला विचारला होता.दोघांनाही कॉलेजच्या त्या मित्राविषयी सांगितले.आम्ही एकत्र कसे काम करायचो अश्या गप्पा त्यांच्याशी मारल्यावर स्मृती मला म्हणते कशी की आई म्हणजे माझा जसा शाळेमध्ये यश हा मित्र आहे तसा तुझा तो मित्र होता का? कारण यश पण माझ्या डोक्यावर ट्प्पल मारतो.म्हणजे लहानपणी मित्राने गंमत म्हणून मारलेली टप्पल आपल्या नजरेला खटकत नाही याउलट हेच मोठ्या वयात तिच्या नजरेला खटकले.तर समाजाला काय म्हणायचे?
मैत्री ही समोरचा स्त्री-पुरुष कोण आहे यावर अवलंबून नाही. माझे विचार ज्याच्याशी जुळतात,मी कुठलाही विषय,कोणतीही अडचण,सुखात-दु :खात, कोणत्याही वेळेस ज्याच्याशी,जिच्याशी मनमोकळेपणाने शेअर करु शकते तो खरा मित्र.आणि यात वयाची अट नसते.
आताही कधीही, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मित्रांशी खूप वेळ मनमोकळ्या गप्पा माराव्यात,त्यांच्याबरोबर सिनेमाला जावे,एकत्र स्केचिंग-फोटोग्राफी करावी,त्या चित्रावर-फोटोवर तासंतास वाद घालावेत.एकत्र कॉफी प्यावी असे नक्कीच वाटते. यासाठी समाजाची, कोण काय म्हणेल याची भिती नाही वाटणार. कारण जवळच्या व्यक्तीचा माझ्यावर असणारा विश्वास व नात्यातील पारदर्शकता. या दोन गोष्टींनी बाकी समाजाशी लढण्याचे बळ येते. व त्या समाजाचा आपल्या मनावर ताण येत नाही.

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...