Thursday, January 14, 2010

... मज फूलही रुतावे

पुस्तकातल्या गोष्टीतल्या जादूगाराचे प्राण कसे एखाद्या झाडावरच्या पंचरंगी पक्षात असतात की नाही?  तसा माझा जीव आहे शब्दात!


मी पुढे जे काही लिहिणार आहे ते तुमच्यापैकी कुणाकुणाला साधे सोडून देण्याजोगे वाटेलही. पण म्हंटलं नां, माझा जीव आहे शब्दांवर.

लग्नानंतर आपण मिटून जायचं नाही म्हणजे काय काय करायचं? काय असते आपली ओळख? आपलं शिक्षण? आपल्या पदव्या? आपला रंग , आपली उंची? आपला सुगरणपणा? छे!! आपली ओळख असते आपली भाषा, आपल्या रिती, आपली माणसं, आपले विचार.

माझं नाव (पूर्णच) मी बदलणार नव्हते. पण गंमत अशी की माझ्या सासूबाईंचं (लग्नानंतरचं बदललेलं) नावही विद्याच आहे. नातेवाईकांना माझं नाव बदललंच पाहिजे असं वाटत होतं आणि माझ्या नणंदा का बदलायचं म्हणून त्यांच्याशी वाद घालत होत्या.(तिथेच उपस्थित असणार्‍या माझं म्हणणं काय आहे हे दोन्ही पक्षांना जाणून घ्यावं असं वाटलं नाही) माझं नाव बदलायचं नाही हे मिलिन्दकडच्यांचं मत किती कौतुकास्पद होतं हे तुम्हांला आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात येईल.पण मी तिथेच नव्हते थांबू शकत, माझं आडनावंही मी बदलणार नव्हते (हे तर माझ्या आईलाही आवडलं नव्हतं) हे मिलिन्दकडे नव्हतं पटलेलं, त्यांनी चालवून घेतलं.

या वीस-पंचवीस वर्षात नवर्‍याच्या आई-वडिलांना सुनेनेही आई-बाबा म्हणायची पद्धत रुढ झाली आहे. माझ्या आई-बाबांखेरीज आणखी कुणाला आई-बाबा म्हणणे मला शक्य नव्हते, ते माझ्यासाठी केवळ शब्द नाहीत, आईबाबांचं शब्दरूपच आहे ते! विचारांनी म्हणाल तर माझ्याशी जास्त जुळणारे माझ्या सासूबाईंचे विचार आहेत, पण ती आई आहे ना? तिच्यात आतडं गुंतलयं माझं. आमच्याकडे आत्या- मामा म्हणायची पद्धत आहे. मी तसं म्हणायला सुरूवात केली. हे ही त्यांनी चालवून घेतलं.

लग्नानंतरही माझं घर मी सोडून दिलेलं नव्हतं त्यामुळे लोकांच्या प्रश्नांना माझी उत्तरेही वेगळी असायची. बरेचदा विचारला गेलेला एक प्रश्न म्हणजे, ’कुलदैवत कुठलं तुमचं?’

’आमच्याकडे आहे तिरूपतीचा बालाजी आणि मिलिन्दकडे अंबेजोगाईची योगेश्वरी’

असं उत्तर मिळाल्यावर समोरचा चक्रावत असे. (लोकांनाही अशा उत्तरांची सवय होऊ देत की!) स्पष्टीकरणासाठी मी तयार असे, पण पुढचा प्रश्न कोणी विचारत नसे. माझ्या मावशा वगैरेंनी हा प्रश्न विचारला तर आवर्जून मी मिलिन्दकडे का? / ना? अशी सुरवात करायचे.

आमच्याकडचा देवघरातला योगेश्वरीचा फोटो पाहून एकीने, ’म्हणजे तुम्ही कोकणस्थ का? (किती छान!) माहित नव्हतं. (वाटलं नव्हतं)’

’मी नाही. मी देशस्थ, मिलिन्द आहे कोकणस्थ.’

आमच्याकडे साबुदाण्याची उसळ म्हणतात, मिलिन्दकडे खिचडी. मी माझा शब्द सोडला नाही, मिलिन्दने त्याचा. मुलांना दोन्ही कळतात. आमच्याकडे म्हणतात स्नान, मिलिन्दकडे आंघोळ. मी स्नान हाच शब्द वापरते. माझी चुलतबहीण लग्नानंतर आंघोळ हा शब्द वापरायला लागली. विचारले,’का गं?’ तर म्हणाली,’ अगं स्नान म्हंटल्यावर सगळे, काय अभ्यंगस्नान का? म्हणून चिडवायचे, मग आठवणीने आंघोळ म्हणायला सुरूवात केली, आता तोच शब्द तोंडात बसलाय.’ (लग्नानंतर काय काय सोडावं लागतं याची एक झलक)

हे लिहिता लिहिता वाटतयं शब्दांच्या वापराच्या बाबतीत उलटही होत असेल, पुरूषांनाही त्यांचे शब्द सोडावे लागत असतील. दोघांमधे जो तथाकथित वरच्या सांस्कृतिक स्तरावरचा समजला जात असेल, त्याची सरशी होत असणार. शब्दांचं हे वैविध्य जपायला हवं. शब्द नुसते एकटे येत नाहीत, त्यांच्यामागे काहीतरी सांस्कृतिक संचित असतं तेही तर जपायला हवं. का आपण एकसारखे होत जाणार?

आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर आपल्या शब्दांनाही टिकवायला हवं, वापरायला हवं. आपलं जे जे आहे ते जपायला हवं. नाहीतर नुसते हाडामासाचेच उरू आपण.

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...